बुलढाणा: पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरी || चंद्रभागे स्नान | तुका मागे हेचि दान ||… या अमृतमय ग्रंथ वाणी प्रमाणे  शेगाव  येथून  विठ्ठलाच्या पंढरीकडे  संत गजानन महाराजांची पालखी ७०० वारकऱ्यांसह उद्या सोमवारी, २ जुन  रोजी  सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे  श्रींच्या मंदिर  परिसरातून प्रस्थान करणार आहे.

 श्री क्षैत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे श्रींच्या पालखीचे ५६  वे  वर्ष आहे. श्रींच्या पालखी समवेत ७०० च्या वर वारकऱ्यांसह , रथ ,मेणा, अश्वासह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, श्रीहरी नामाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात सहभागी होणार आहे. ‘जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल , जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते’, मंत्राचा नाम जप करीत वारकरी संतनगरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे प्रस्थान करणार आहेत. तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास आणि ७२५ किमी चे अंतर कापून श्रींची पालखी ४ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे.

श्रींची पालखी संतनगरी शेगावातून निघाल्यानंतर २ जुन रोजी दुपारी श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थान मध्ये पोहचणार आहे. महाप्रसाद घेऊन सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील.  ३ जुन रोजी पारस येथून निघून दुपारी गायगाव येथे तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. ४ जून रोजी सकाळी भौरद येथून निघून अकोला येथे ४ व ५ जून असा दोन दिवस श्रींच्या  पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर  निर्धारित मार्गाने श्रींची पालखी ४ जुलै  रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचणार आहे.

भुलोकावरील वैकुंठी ९ जुलै पर्यंत मुक्कामी

श्री विठ्ठलाच्या पंढरीत श्रींच्या पालखीचा मुक्काम ४ जुलै ते ९ जुलै पर्यंत राहणार आहे. श्री गजानन महाराज संस्थान च्या पंढरपूर शाखेत श्रींच्या पालखीचा पाच दिवस मुक्काम राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परतीचा प्रवास

श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास संत नगरी शेगाव कडे १० जुलै रोजी सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किमी चा प्रवास आहे. असा येण्या जाण्याचा १३०० किमीचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्ती भावाने आनंदात करणार आहेत. ३० जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर ३१ जुलै  गुरुवार रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावी पोहोचणार आहे.