वाशिम : मृग नक्षत्र कोरडाच गेला. जिल्ह्यात उशिरा पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र १९ व २३ जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील २९ हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. बळीराजा चिंतेत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड जिल्ह्यात आले. मात्र, त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नाही. कुठल्याच शेतकऱ्याची भेट घेतली नाही. केवळ बैठकांचा फार्स आटोपून निघून गेल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात कारंजा, मानोरा आणि मंगरूळपीर तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुराच्या आपदेने बळीराजा संकटात सापडले आहेत. नद्या नाल्यांना पूर आले. पुराचे पाणी शेतात शिरले. अनेकांची घरे खचली. जनावरे दगावली, पिके खरडून गेली. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची गरज असताना पालकमंत्री राठोड जिल्ह्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठी आशा होती. परंतु पालकमंत्री राठोड यवतमाळ मार्गे जिल्ह्यात आले आणि मनोरा मार्गे दिग्रसकडे सुसाट वेगाने निघून गेले. यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – बुलढाणा : अतिवृष्टीचा संग्रामपूर, जळगावला तडाखा! हजारो हेक्टर जमीन खरडली; दोनशे जनावरे दगावली

हेही वाचा – चंद्रपूर : राजुरा येथील घटनेतील दोषींना तात्काळ अटक करा, मुनगंटीवार यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मदत, पुनर्वसन मंत्र्यांकडून अपेक्षाभंग!

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले असताना राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटीलदेखील जिल्ह्यात आले. ते तरी शेतकऱ्याच्या व्यथा, वेदना समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जातील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु त्यांनीदेखील पालकमंत्री संजय राठोड यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ आढावा बैठक घेतली आणि निघून गेले. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.