अकोला : सणासुदीच्या काळात प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अकोला मार्गे धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर व काचीगुडा-बिकानेर या दोन साप्ताहिक विशेष गाड्यांना डिसेंबरअखेर व जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्तर-पश्चिम भारतात जाण्यासाठी सोयीस्कर असलेल्या या गाड्यांना मुदतवाढ मिळाल्याने प्रवासी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर व ओखा- मदुराई या तीन उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत संपत आहे.

हेही वाचा : सोयाबीनवर ‘यलो मोझॅक व्हायरस’, शेतकरी चिंतेत, उत्पादनात घट होण्याची भीती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोलामार्गे धावणाऱ्या या गाड्यांच्या केवळ एक-एक फेऱ्या शिल्लक असताना दक्षिण मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेकडून मुदतवाढ देण्यात आली नव्हती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता होती. प्रवासी संघटनांनी विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. याची दखल घेत रेल्वेने हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर डिसेंबरअखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ०७११५ हैदराबाद – जयपुर २९ डिसेंबर, ०७११६ जयपुर – हैद्राबाद ३१ डिसेंबर, ०७०५४ बीकानेर – काचीगुडा २ जानेवारी २०२४ व ०७०५३ काचीगुडा – बिकानेर ३० डिसेंबरपर्यंत धावणार आहे. ओखा- मदुराई विशेष गाडीला मात्र अद्याप मुदतवाढ देण्यात आलेली नाही.