नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून(एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक पदासाठी संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेची जाहिरात २३ जून २०२२ प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षेची नियुक्तीसहीत संपूर्ण प्रक्रिया मे २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, परीक्षेच्या पूर्व, मुख्य, मैदानी चाचणी, मुलाखत या प्रत्येक टप्प्यावर न्यायालयीन प्रक्रिया आणि अन्य कारणांमुळे तब्बल अडीज वर्षापेक्षा जास्त उशीर झाला. अखेर आयोगाने १० जानेवारी २०२५ ला अंतिम निकाल जाहीर करून शिफारस पत्र दिली. परंतु, त्यानंतरही सरकारकडून या ६०३ उमेदवारांना अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही.

‘एमपीएससी’ जून २०२२ मध्ये पोलीस उपनिरीक्षकांच्या ६०३ पदांसाठी जाहिरात दिली होती. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२२ ला पूर्व परीक्षा झाली. तृतीयपंथींना परीक्षेची संधी देण्यात आली तरी त्यांचे मूल्यांकन, आरक्षणाचा दर्जा, शारीरिक चाचणीचे निकष यासंदर्भातील धोरण तयार नसल्याने पूर्व परीक्षेचा निकाल रखडला. हा निकाल लवकर लागावा म्हणून उमेदवारांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले. आयोगाला दिलेल्या निवेदनानंतर अखेर पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला. याच्या एक वर्षानंतर मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखती घेण्यात आल्या असून सप्टेंबर २०२४ मध्ये तात्पुरती निवड यादी आणि १० जानेवारी २०२५ ला अंतिम निवड यादीही जाहीर करण्यात आली. यानंतर उमदेवारांना मिळालेली शिफारस पत्रे गृह मंत्रालयाकडे जमा करण्यात आली. परंतु, मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृह मंत्रालयाकडून अद्याप नियुक्ती न मिळाल्याने विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. आधीच निवड प्रक्रियेला प्रचंड विलंब झाल्यामुळे शासनाने लवकर नियुक्ती द्यावी अशी मागणी उमेदवार करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा आहे अडीच वर्षांचा खडतर प्रवास

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या पूर्व परीक्षेच्या एक वर्षानंतर म्हणजे ऑक्टोबर २०२३ ला मुख्य परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी तृतीयपंथी उमेदवारांसाठी धोरण तयार नव्हते. त्यामुळे मुख्य परीक्षेचा निकाल रखडला होता. हा निकाल जाहीर झाला परंतु त्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यामुळे निर्माण झालेले कमी मनुष्यबळाचे कारण देत आयोगाने शारीरिक चाचणी पुढे ढकलली. निवडणुकीनंतर शारीरिक चाचणी आणि मुलाखती झाल्या. १ ऑगस्टला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. परंतु, पुन्हा काही उमेदवार न्यायालयात गेल्याने पुन्हा निकालाची प्रक्रियेवर स्थगिती आली. हा संपूर्ण प्रवास झाल्यावर आयोगाने १० जानेवारी २०२५ ला अंतिम निकाल जाहीर करून शिफारस पत्रे उमेदवारांना दिली.