नागपूर : चालकाने ट्रकमधून सहा कोटी रुपयांच्या मालाची चोरी केल्याची तक्रार ट्रक मालकाने केली. याप्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा नोंदविला आणि प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान, ट्रक मालक आणि चालक यांच्यात तडजोड झाल्याने गुन्हा मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांना आणि न्यायालयाला झालेल्या नाहक त्रासामुळे याचिकाकर्त्यांना न्यायालयाने अनोखी शिक्षा सुनावली. शासकीय अधिवक्ता ग्रंथालयाला २५ हजार रुपये दान देण्याची शिक्षा न्यायालयाने त्यांना सुनावली.

पारडी पोलीस स्थानकात २ जून २०२३ रोजी एका ट्रक मालकाने तक्रार केली की, त्यांचा ट्रक सहा कोटीच्या मालासह बेपत्ता झाला आहे. २६ मे रोजी ट्रक क्रमांक केए ५३ एए ४२३३ बंगळुरू येथून दिल्लीच्या दिशेने सहा कोटी रुपयांचा माल घेऊन निघाला. ट्रकमध्ये दोन चालक आणि दोन मदतनीस होते. २९ मे रोजी हा ट्रक चारही लोकांसह बेपत्ता झाला. चालकाचा भ्रमणध्वनीही संपर्कक्षेत्राच्या बाहेर होता. यानंतर ट्रक पारडी परिसरातील पेट्रोल पंपाच्या जवळ आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी चालकांसह चार लोकांवर गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केले. दरम्यानच्या काळात, चालक आणि ट्रक मालकामध्ये तडजोड झाली. सर्व माल परत मिळाला असून आरोपींबाबत काहीही तक्रार नसल्याचे हमीपत्र मालकाने लिहून दिले.

हेही वाचा : पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ, काय आहे हवामानाचा अंदाज जाणून घ्या

हेही वाचा : “हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आरोपी चालक आणि मदतनीस अद्यापही माझ्याकडे काम करतात, त्यामुळे त्यांच्याविरोधात काहीही तक्रार नाही. वरील गुन्हा हा गैरसमजातून नोंदविण्यात आला होता आणि माझे हे विश्वासपात्र कामगार आहेत’, असेही ट्रक मालकाने न्यायालयाला सांगितले. यावर न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र याप्रकरणी पोलिसांची धावपळ झाल्यामुळे २५ हजार रुपये शासकीय अधिवक्ता ग्रंथालयाला देण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली. दोन आठवड्यात ही रक्कम ग्रंथालयात जमा करायची आहे. न्या. विनय जोशी आणि न्या.वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड.साहिल माटे यांनी तर पोलिसांच्यावतीने ॲड.एस.ए.अशीरगडे यांनी युक्तिवाद केला.