नागपूर : तीन दिवसांपूर्वीच थाटामाटात लग्न झाल्यानंतर नवरी नांदायला सासरी आली. घरची देवपूजा आटोपून मधुचंद्रासाठी फिरायला जाण्याची नवदाम्पत्याची लगबग सुरु होती. लग्नघरी आलेल्या पाहुण्यांची गावी जाण्याची घाई सुरु असतानाच युवक त्याच्या मित्राला भेटायला चौकात गेला.

दरम्यान, पत्नीचा फोन आल्यामुळे तो दुचाकीने परत निघाला. मात्र, नियतीला काही औरच मान्य होते. रस्त्याने जात असताना एका अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाला. पत्नी दारात वाट बघत असतानाच पतीच्या निधनाची वार्ताच घरी आली. त्यामुळे पाहुण्यांनी भरलेल्या घरात एकच गोंधळ उडाला. ही दुर्दैवी घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. निखील हर्षे (३२) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

हेही वाचा…वऱ्हाड्यांच्या बसला ट्रकची धडक, दोन सख्ख्या बहिणींसह चार ठार; राळेगाव-कळंब मार्गावरील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निखील हर्षे याचे २४ एप्रिलला मोठ्या थाटामाटात लग्न झाले. निखिल हा चंद्रभागानगर येथे राहत होता. लग्नसमारंभातून थोडी उसंत मिळाल्याने शनिवारी घरमालकाची दुचाकी घेऊन तो घराबाहेर पडला. तत्पूर्वी, पत्नीला सांगितले की काम आटोपून लवकर येतो. बराच वेळ झाल्यामुळे पत्नीने त्याला फोन केला आणि घरी बोलावले. मात्र, तो आलाच नाही, त्याच्या जागी त्याचे पार्थिव घरी पोहोचले. तो जबलपूर ते नागपूर आउटर रिंग रोडवरील टाटा मोटर्स जवळून जात असताना अज्ञात वाहन चालकाने निखिलच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत निखिल गंभीर जखमी झाला. अपघातानंतर आरोपी वाहन चालक पळून गेला. घटनास्थळी वाहन चालकांची गर्दी जमली. नागरिकांनी हुडकेश्वर पोलिसांना अपघाताची सूचना दिली. निखिलला मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.