अकोला : जिल्ह्यातील राजकारणात अकोट मतदारसंघात राबविण्यात येणारा ‘मामु’ फॅक्टर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माळी, मुस्लीम, दलित व इतर समाजाचे एकत्रित मते समीकरणावर मोठा प्रभाव टाकू शकतात. हे लक्षात घेऊनच काँग्रेसने माळी समाजातून येणारे ॲड.महेश गणगणे यांना संधी दिली.भाजपचे प्रकाश भारसाकळे यांची मदार मराठा मतांवर दिसून येते. अकोटमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत होत असल्याचे चित्र आहे.मतदारसंघात जातीय समीकरण निर्णायक ठरणार आहे.अकोट मतदारसंघ कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे.

सलग तिसऱ्यांदा प्रकाश भारसाकळे भाजपकडून रिंगणात आहेत. काँग्रेसने गणगणे परिवारावर विश्वास दाखवून ॲड. महेश गणगणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. २०१९ च्या निवडणुकीत मराठा समाजाचे मतविभाजन झाले होते.यावेळेस देखील मराठा समाजाच्या गठ्ठा मतपेढीवर भाजपची भिस्त आहे. समाजात तीव्र नाराजी देखील असल्याने ऐनवेळी त्याचा मोठा फटका बसू शकतो. तिसऱ्या आघाडीकडून शेतकरी संघटनचे ललित बहाळे हे मैदानात असल्याने मराठा मते विभाजित होण्याची दाट शक्यता आहे. अकोट मतदारसंघासह जिल्ह्यात माळी समाजाची मोठी मतपेढी आहे.

हेही वाचा…दलित समाजाचा उमेदवार पडल्यास याद राखा, ‘यांनी’ काढली काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी

ही गठ्ठा मते पक्षाकडे कायम राहण्याच्या दृष्टीने ॲड. महेश गणगणे यांच्या माध्यमातून काँग्रेसने समाजाला प्रतिनिधित्व दिले. अकोटमध्ये माळी मतदार निर्णायक संख्येत आहेत. शिवाय मुस्लिमांची भूमिका देखील महत्त्वाची असून त्यांचे बहुसंख्य मतदान आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ६९ हजार ०६० मते घेऊन भाजपसोबत बरोबरीचा सामना केला होता.
वंचित आघाडीने दीपक बोडके यांना उमेदवारी दिली. त्यांचे वडील रामदास बोडके पूर्वाश्रमीचे वंचितचेच लोकप्रतिनिधी व नेते होते.

मात्र, नंतर त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडली. रामदास बोडके यांचे एक पूत्र गेल्या वेळेस काँग्रेसकडून उमेदवार होते. यावेळेस वंचितकडून दुसऱ्या पुत्राला संधी देण्यात आली. या उमेदवारीच्या निर्णयावरून मतदारसंघातील दलित समाजामध्ये तीव्र नाराजी असल्याची माहिती आहे. ॲड. आंबेडकरांची साथ सोडणाऱ्यांच्या कुटुंबात वंचितची उमेदवारी कशाला? असा संतप्त सवाल करून समाजातून रोषाची भावाना देखील व्यक्त केली.त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न झाला. या सर्व प्रकारानंतर दलित मतदार कुणाकडे वळतात, यावर मतदारसंघाचे बरेच समीकरण अवलंबून राहील.

हेही वाचा…‘या’ जिल्ह्यातील माणूस मुख्यमंत्रीपदी नाना पटोले म्हणतात,’ फडणवीसांचा रडीचा डाव…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वंचितच्या भूमिकेमुळे भाजपच्या मतपेढीला धक्का

अकोटमध्ये वंचित आघाडीने बारी समाजाचे दीपक बोडके यांना संधी दिली. बारी समाजाची गठ्ठा मते मतदारसंघात आहेत. या समाजाची मते त्यांच्याच उमेदवाराकडे वळण्याची चिन्हे आहेत. बारी समाजाची मते परंपरागत भाजपकडे जात असल्याचे बोलल्या जाते. मात्र, आता वंचितच्या भूमिकेमुळे भाजपच्या मतपेढीला मोठा धक्का बसला आहे.