वाशीम : कल्याण मुंबईवरून अमरावतीकडे जात असलेल्या ट्रकने वाशीम जिल्ह्यातील कारंजा अमरावती महामार्गावर टाकळी फाट्याजवळ अचानक पेट घेतला. यामध्ये जीवितहानी टळली असली तरी लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली. प्राथमिक माहिती नुसार ट्रक क्रमांक एम एच ०५ ए एम २९२२ कल्याण येथून अमरावतीकडे जात असताना कारंजा अमरावती महामार्गावरील कामगारगावासमोर असलेल्या टाकळी फाट्याजवळ अचानक ट्रकने पेट घेतला.

हेही वाचा : कविवर्य राजा बढे यांच्या राज्यगीताची कोनशिला कचऱ्यात

चालक अजय कुमार गौतम व सोबत असलेल्या व्यक्तीच्या आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी ट्रकमधून उतरून कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल यांना माहिती दिली. अग्निशामक दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. परंतु, ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ट्रकमध्ये असलेले साहित्य पूर्णपणे जळून निकामी झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. पुढील कारवाई धनज पोलीस ठाणे करीत आहे.