गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवरील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवडाभरात या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. रविवारी संध्याकाळी चामाेर्शीवरून धानाेराकडे लाेहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकी अनियंत्रित झाल्याने मागे बसलेला गणेश वामन चाैधरी (२८, रा. मूल) ट्रकच्या समाेरच्या चाकात सापडला व जागीच ठार झाला. यामुळे लोहखनिज वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांनी आक्षेप नोंदवत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.

सूरजागड लोहखनिज प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून विकास आणि रोजगाराचे मोठमोठे दावे केल्या जात आहे. मात्र, या खनिजाच्या वाहतुकीसाठी लागणारी पायाभूत सुविधा अद्याप निर्माण न केल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आठवडाभरात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने धडक दिल्याने पाच जणांना जीव गमावावा लागला. यातील सर्वच मृतक कर्ते तरुण असल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.

२५ मे रोजी गडचिरोली येथील गांधी चौकात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने वळणावर दुचाकीला धडक दिली. यात मागे बसलेला गणेश चौधरी जागीच ठार झाला. अपघातात चालक थोडक्यात बचावला. गणेश हा खादी ग्रामोद्याेग चंद्रपूर येथे नाेकरीवर हाेता. रविवारी कार्यालयाला सुटी असल्याने ताे मित्राला भेटण्यासाठी गडचिराेली येथे आला हाेता. अपघाताच्या वेळी त्याचा मित्र दुचाकी चालवत हाेता, तर गणेश हा मागे बसला हाेता. ट्रकची धडक बसल्यानंतर चालक दुसऱ्या बाजूला काेसळला. सुदैवाने मागून काेणतेही वाहन येत नसल्याने ताे बचावला. मात्र मागे बसलेल्या गणेशच्या डाेक्यावरून ट्रकचे चाक गेले व ताे जागीच ठार झाला.

‘स्वतंत्र बायपास मार्ग तयार करा’

लाेहखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना (ट्रक) गडचिराेली शहरातून जाण्यास बंदी घालण्यात यावी. मालवाहू वाहनांसाठी स्वतंत्र बायपास मार्ग तयार करावा, यांसह विविध मागण्या करीत युवकांनी मृतदेह उचलू देण्यास नकार दिला. जवळपास एक तास त्याच ठिकाणी मृतदेह हाेता. अपघात पाहण्यासाठी चाैकात माेठी गर्दी उसळली. त्यामुळे वाहतुकीची काेंडी झाली. ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मध्यस्तीनंतर मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अवजड वाहतूकीवर नियंत्रण हवे’

सोवारी आमदार डाॅ. नराेटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुनेश्वर बोरकर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी अवजड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली.