लोकसत्ता टीम

नागपूर: भारतातील वाघांची संख्या नेमकी किती याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या व्याघ्रगणनेचा पेटारा नेहमी २९ जुलैला व्याघ्रदिनाच्या दिवशी उघडला जातो. यावेळी या प्रथेला फाटा देण्यात आला आणि व्याघ्रदिनाला हा पेटारा उघडलाच नाही. मात्र, ही प्रतिक्षा संपली असून येत्या नऊ एप्रिलला व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर होणार आहे.

म्हैसूर येथे आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्ररिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून ते व्याघ्रगणनेचा अहवाल प्रसिद्ध करणार आहेत. विशेष म्हणजे भारताने नुकतेच व्याघ्रप्रकल्पाची पन्नाशी पूर्ण केली आहे. जगभरातील व्याघ्रसंख्येच्या ७० टक्के वाघ भारतात आहेत. वाघांच्या संख्या वाढीचा दर हा वार्षिक सहा टक्के आहे. २००६ ते २०१८ या बारा वर्षाच्या कालावधीत भारताने व्याघ्रसंवर्धनावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केल्यामुळे वाघांची संख्या दुप्पट झाली. म्हैसूर येथे नऊ एप्रिलपासून आयोजित तीन दिवसीय परिषदेत व्याघ्रसंवर्धनासाठी अधिक राजकीय आणि सार्वजनिक समर्थन मिळवण्याचे भारताचे प्रयत्न राहतील. याच परिषदेत वाघांचे ५० रुपयाचे नाणे देखील प्रसिद्ध केले जाईल.

आणखी वाचा- चंद्रपूर: वाघिणीसह बछड्याचा मृतदेह सापडला; शिकार की नैसर्गिक मृत्यू ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील वाघ जाणार कंबोडियात !

दक्षिण आफ्रिकेतून ज्याप्रकारे भारतात चित्ता आणले गेले, त्याचप्रकारे भारतातून कंबोडियामध्ये वाघांना आणण्याची योजना देखील या परिषदेत जाहीर केली जाऊ शकते. कंबोडीयामध्ये २००९ मध्ये वाघ पूर्णपणे नामशेष झाला होता. त्यानंतर भारत आणि कंबोडियामध्ये वाघाच्या स्थलांतरणाचा एक करार करण्यात आला. त्यानंतर कंबोडियाचे एक शिष्टमंडळ देखील भारतात येऊन गेले. तर भारताचे शिष्टमंडळ देखील कंबोडिया येथे जाऊन आले. कंबोडियातून वाघांच्या बेपत्ता होण्याचे कारण शोधले जाईल. शिकारतळ, शिकारी, गस्त, पायाभूत सुविधा यांची खात्री केल्यानंतरच पुढचे पाऊल उचलले जाईल.