अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता एमपीएससीने उपाययोजना आखण्यास सुरूवात केली असून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने आयोगाच्या अर्ज प्रणालीमधील खात्याची आधार व इतर पद्धतीने ‘केवायसी’ करणे अनिवार्य असणार आहे. प्रत्येक अर्ज भरण्यापुर्वी जर उमेदवाराने ‘केवायसी’ पडताळणी केली नाही, तर त्याला अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे उमेदवाराला मनस्तापाला सामोरे जावे लागू शकते. यासंदर्भात ‘एमपीएससी’ने माहिती पत्रक प्रसिद्ध केले आहे.
‘एमपीएससी’ची पद्धत काय?
शासन सेवेतील विविध पदभरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन अर्ज करण्याकरीता संबंधित उमेदवाराला प्रथम आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर विहित पध्दतीने एक वेळची नोंदणी (वन टाईम रजिस्ट्रेशन) करावी लागते. तसेच विहित पध्दतीने नोंदणीनंतर संबंधित खात्यामध्ये (प्रोफाईल) अर्हतेसंदर्भातील विविध प्रकारचा तपशील नोंदवावा लागतो. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणीकृत उमेदवारांच्या ओळख पडताळणीकरीता उमेदवारांच्या खात्यामध्ये आधार क्रमांक नोंदविण्याची पध्दती व सुविधा मार्च २०१७ पासून लागू करण्यात आली आहे.
भरतीप्रक्रियांच्या विविध टप्प्यावर उमेदवाराचे प्रमाणीकरण करण्यासाठी स्वेच्छा तत्वावर आधार अधिप्रमाणीकरणाचा वापर करण्याकरीता विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) मान्यता दिली आहे. तसेच, राज्य शासनाकडून भरतीप्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्याकरीता ई-केवायसी सेवांसाठी स्वेच्छा तत्वावर आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्यासाठी एमपीएससीला प्राधिकृत केले आहे.
नवीन पद्धत कोणती?
आता आधार ऑनलाईन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाईन पेपर आधारित केवायसी, नॉन आधार ऑफलाईन केवायसी या पद्धतीतून ओळख पडताळणी करावी लागणार आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रमणालीमध्ये प्रथम नोंदणी करणाऱ्या उमेदवाराला भ्रमणध्वनी तसेच ईमेल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, पण आता आधार आधारित ओळख पडताळणीच्या व्यवस्थेमुळे आधार क्रमांकाशी संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देणे अनिवार्य ठरविण्यात आले आहे.
येत्या १५ जुलैपासून हा नवा नियम आयोगाकडून लागू करण्यात येणार आहे. या पडताळणीची प्रक्रिया उमेदवार स्वेच्छेने कधीही करु शकत असला तरी उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर पडताळणी प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी. या केवायसी प्रक्रियेनंतर ऑनलाईन अर्ज प्रणालीत उमेदवाराचे केवळ एकच खाते सेव्ह करता येईल, एकापेक्षा अधिक खाती असल्यास ती आपोआप निष्क्रीय होतील. त्याचबरोबर उमेदवाराच्या आधारशी जो फोन क्रमांक जोडलेला आहे तोच फोन क्रमांक अर्ज सादर करताना भरणे अनिवार्य असणार आहे.