गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलवादग्रस्त भागातील नागरिकांसाठी प्रवासाचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने दुर्गम आंबेझरीसह एकूण १५ गावांना जोडणाऱ्या एस.टी. बससेवेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावकऱ्यांनी पारंपरिक नृत्य, वाद्यांच्या गजरात बसचे स्वागत केले.
गडचिरोली-चातगाव-धानोरा-येरकड-मुरुमगाव-खेडेगाव-आंबेझरी-मंगेवाडा-जयसिंगटोला-मालेवाडा या मार्गावर सुरु झालेल्या या सेवेमुळे जिल्हा पोलीस मुख्यालयापासून १०० कि.मी. आणि कटेझरीपासून २१ कि.मी. अंतरावर असलेल्या आंबेझरी व आजूबाजूच्या गावांना प्रवासासाठी एक नवे दालन खुले झाले आहे. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर प्रथमच बस पोहोचल्याने गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत बसचे जल्लोषात स्वागत केले.
शालेय विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. बससेवेचे उद्घाटन पोस्टे कटेझरीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या सेवेमुळे सात दशकांची पायपीट बंद होऊन विद्यार्थ्यांसह नागरिकांना तहसील आणि जिल्हा मुख्यालयी पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.
गेल्या काही महिन्यांत गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून गट्टा (जा.)-गर्देगाव, मरकणार-अहेरी आणि कटेझरी-गडचिरोली अशा मार्गांवरही प्रथमच बससेवा सुरू झाली आहे. याच काळात ५०७ मोबाईल टॉवर उभारण्यात आले असून, ४२० कि.मी. लांबीचे रस्ते व ६० पूल पूर्णत्वास आले आहेत.
या उपक्रमामागे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. उपविभागीय पोलीस अधिकारी (धानोरा) जगदीश पांडे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच अजय भोसले व त्यांच्या टीमने विशेष योगदान दिले. कायदा सुव्यवस्था राखण्यासह गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्यातील दुर्गम भागांचा विकास, दळणवळण यासाठी देखील सुरु असलेल्या प्रयत्नांचा गावाकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.