वर्धा : महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती या संस्थेमार्फत राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. त्यांना उच्च शिक्षणाच्या विविध पदवी घेण्यासाठी ज्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात, त्याची ही तयारी असते.
प्रशिक्षणाचे स्वरूप :
अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने जेईई/नीट/एमएचटी -सीईटीचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.मोफत प्रशिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट व प्रतिदिवस ६ जीबी इंटरनेट सेवा देण्यात येते.
पात्रता निकष :
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा. उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अशी पाहिजेत.
ओळखपत्र :
आधारकार्ड/मतदान कार्ड, जात प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे.
प्रशिक्षणासाठी निवड पद्धती :
प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. प्राप्त अर्जांची छाननी करून १० वीला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे व संवर्गनिहाय तसेच समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची निवड करण्यात येते. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२५ ही आहे. प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. इतर मागासवर्ग ५९ टक्के, विमुक्त जाती १० टक्के, भटक्या जमाती- ब ८ टक्के, भटक्या जमाती – क ११ टक्के, भटक्या जमाती- ड ६ टक्के व विशेष मागास प्रवर्ग ६ टक्के असे राहील. प्रवर्गनिहाय महिलांसाठी ३० टक्के आरक्षण राहणार. दिव्यांगासाठी ४ टक्के तर अनाथांसाठी १ टक्के जागा आरक्षित आहे.
महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. अर्जंसोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षकित करून स्पष्ट दिसतील अश्या पद्धतीने स्कॅन करून जोडावे लागणार. पोस्टाने किंवा इमेल अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास निवड रद्द केल्या जाणार आहे.अर्ज भरतांना अडचण आल्यास महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करण्याची सूचना आहे.