भंडारा : तुमसर शहरात ग्राहकांना विश्वासात न घेताच महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहे. यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत. महावितरणकडून तुमसर शहरात ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा परवानगी न घेता त्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले जात असल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र विरोध होत असून, तरीदेखील महावितरणकडून नेमलेले ठेकेदार जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे.
तुमसर शहरातील हनुमान नगर परिसरात महावितरणच्या अधिकृत ठेकेदारांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता नागरिकांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू केले आहे. अनेक ठिकाणी दुपारच्या वेळेत लोक घरी नसताना जुने मीटर काढून नव्या स्मार्ट मीटरची जोडणी करण्यात आली. त्यामुळे संतप्त ग्राहक थेट महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात पोहोचले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला की, “कुणाची परवानगी घेतली? आमच्याशी काही संवाद न साधता आमच्या घरी स्मार्ट मीटर का लावले?”
ग्राहकांनी आरोप केला की, ठेकेदारांनी त्यांच्या मीटरची जबरदस्तीने अदलाबदल करून तीव्र अनागोंदी निर्माण केली आहे. “आमच्या मीटरची चोरी झाली असून, आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही,” असा थेट आरोपही काही ग्राहकांनी केला.
याबद्दल महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर हे कॉन्ट्रॅक्टरने लावले असे सांगितले आहे. त्यांना तसे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले असून त्यांना विचारणा करावी लागेल असे उत्तर दिले. त्यात परवानगी न घेता स्मार्ट मीटर लावणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई व्हावी यासाठी ग्राहकांनी मागणी केली असून आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख अमित मेश्राम, प्रविण जीभकाटे, मेहबूब शेख, नामदेव चाचिरे, सर्वेश गिरीपुंजे, अभय चाचिरे, राजू सातपुते, विदेश डोईफोडे, शरद जीभकाटे, अशोक चाचिरे, भुमेश गिरीपुंजे उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्राहकांनी मागणी केली आहे की, “स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवर बंदी घालावी. या मीटरमुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. मीटरमधून चुकीचे बिल येण्याची भीती असून यामुळे सर्वसामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत येऊ शकतो.” या प्रकारामुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यातील विश्वासाचं नातं ढासळत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.