लोकसत्ता टीम

गडचिरोली : मागील पाच ते सात वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील काही शहर अवैध सट्टेबाजार चालवणाऱ्यांच्या विळख्यात सापडली असून या माध्यमातून दरवर्षी ‘आयपीएल’वर कोट्यवधीची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.

दोन वर्षांपूर्वी अहेरी पोलिसांनी कारवाई केली होती. पण त्यानंतरदेखील परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नोकरदार वर्ग आणि युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे. सुरवातीला चंद्रपूरमधून हा सट्टा चालविला जात होता. पण पोलिसांच्या दणक्याने काही ‘बुकिंनी’ तेलंगणा सीमाभाग गडचिरोलीतील अहेरी, आलापल्ली, देसाईगंज शहरांना लक्ष्य केले आहे. त्यांनी या भागातील महत्वाच्या शहरांत ‘बुकी’ नेमले आहेत. कमी कालावधीत लाखो कमविण्याच्या लालसेने अनेक तरुण ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात सापडले आहे.

आणखी वाचा-गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात; गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू

या सट्टाबाजाराचे लोण जिल्ह्यातील देसाईगंज, गडचिरोली, अहेरी, आलापल्ली परिसरात पसरले आहे. सध्या ‘आयपीएल’चा हंगाम असल्याने क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा लावल्या जात आहे. हा सट्टा पूर्वी चंद्रपुरातून नियंत्रित केल्या जात होता परंतु आता याचे केंद्र तेलंगणा सीमाभागात हलविण्यात आले आहे. मोठ्या बुकिंनी गावागावात काही व्यक्ती नियुक्त केले आहे. ते सट्टा खेळणाऱ्याला ऑनलाईन लिंक पुरवितो. यामाध्यमातून प्रत्येक सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावल्या जात असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी अहेरी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. परंतु कारवाईनंतरही सट्टा सुरूच असल्याने अनेक तरुण व नोकरदार वर्ग या जुगाराच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याचा नादात अनेकांवर कर्जबाजारी होऊन फिरण्याची वेळ येत आहे. तर सट्टा चालविणारे अल्पावधीतच कोट्यधीश झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सट्टेबाजांना आवर घालण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.

आणखी वाचा-पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली! बहिणीच्या संसारालाच सुरुंग…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘त्या’ कारवाईवर प्रश्न?

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी ऑनलाईन सट्टा चालविणाऱ्यांचे ‘रॅकेट’ उध्वस्त केले होते. पण त्या कारवाईत मुख्य सूत्रधाराला सोडून लहान बुकिंवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे कारवाईनंतरही हा सट्टा नियमित चालू होता. त्यानंतर मात्र कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामागे शेकडो कोटींची उलाढाल कारणीभूत होती. अशी चर्चा तेव्हा होती.