अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यात आज विकास संवाद सभा झाली. यावेळी सभास्थळी देवेंद्र फडणवीसांचे आगमन होताच पावसाला सुरुवात होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. सभेत त्याचा उल्लेख होताच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तोच धागा पकडून विरोधकांना टोला लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात बऱ्याच बड्या नेत्यांना गार केले आहे, असे वक्तव्य मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी करून विरोधकांवर निशाणा साधला.
भाजपच्यावतीने अकोला शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर विकास संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. श्याम खोडे, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आदींसह अकोला, वाशीम जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून विरोधकांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यांनी महाराष्ट्रातील बऱ्याच मोठ्या नेत्यांना गार केले आहे. अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर विकास केला. त्यांनी एकदा निश्चय केला तर देवेंद्र फडणवीसांचे काम कोणीच थांबवू शकत नाही. राज्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.’’
देशाचे पालकतत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तर राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रश्नांचा त्यांना दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे प्रत्येकाला ते आपलेसे वाटतात. त्यांचे नेतृत्व सर्वव्यापी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जाणार आहे, असा विश्वास शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
निवडणुकीत मतदारांनी परतफेड करावी
केंद्र व राज्य शासनाद्वारे जनहिताच्या असंख्य योजना राबविण्यात येत आहेत. देशासह महाराष्ट्रात परिवर्तन दिसून येते. प्रत्येकाच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला. केंद्र, राज्यातील सत्ता स्थानिक पातळीवर देखील असणे आवश्यक आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मते देऊन परतफेड करायची आहे, असे आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी मतदारांना केले.