लोकसत्ता टीम

चंद्रपूर : मुसळधार पावसामुळे चिचपल्ली येथील मामा तलाव फुटला. यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. येथील पूरपीडितांना प्रशासन व भाजप पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वतोपरी मदत पुरविण्याच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत. बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे नुकसान, धान्याची नासाडी तसेच कपडे व इतर साहित्य पाण्यासोबत वाहून गेल्याचे निदर्शनास आले. या संकट काळात पूरपीडितांना आवश्यक ती सर्व मदत पोहचवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पूरपीडितांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहील, असे आश्वासन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

चिचपल्ली येथे पुराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना मुनगंटीवार बोलत होते. ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे किंवा नुकसान झाले आहे, अशा सर्व नागरिकांची जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे. गावातील नाल्यावरील अतिक्रमण काढून त्यांचे पुनर्वसन करून देऊ. तसेच पूल मोठा करण्याबाबतही उपाययोजना केल्या जातील. पाऊस ओसरल्यानंतर फुटलेल्या तलावाची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

आणखी वाचा- चंद्रपूर: वेकोलित ओबीसींना आरक्षण धोरणानुसार नोकरी…जाणून घ्या सविस्तर

ज्या घरांचे नुकसान झाले आहेत, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनाम्यापासून एकही घर सुटणार नाही, याची काळजी घ्यावी. पंचनाम्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये जाहीर करावी, अशा सूचनाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केल्या.

पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर आर्थिक मदत जमा

चिचपल्ली आणि पिंपळखूट येथे पूरपीडितांसोबत संवाद साधत असतानाच पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पूरग्रस्तांना पहिली मदत पाच हजार रुपये तत्काळ बँकेत जमा करण्यासाठी अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे सूचना केली. यानंतर लगेच खात्यात पैसे जमा होत असल्याचे संदेश नागरिकांना प्राप्त झाले, असे तहसीलदार विजय पवार यांनी सांगितले. चिचपल्ली येथील २२४ तर पिंपळखूट येथील १०९ लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

आणखी वाचा-चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला! वाघाने केले महिलेला ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनादेशाचे वाटप

पुरामध्ये बकऱ्या आणि बैलजोडी वाहून गेलेल्या नागरिकांना पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात चिचपल्ली येथील देवरात मत्ते यांना १७,२०० रुपयांचा धनादेश, बाबुखान पठाण यांना आठ हजार, वसंत मडावी यांना आठ हजार, भाऊराव दुर्योधन यांना १६ हजार, प्रमोद आडे यांना ६० हजार, तर दिनेश लाकडे यांना ८४ हजार रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. सोबतच पिंपळखुट येथील अभिमन्यू आत्राम यांना १६ हजार रुपयांचा आणि महादेव आत्राम यांना २८ हजार ६०० रुपयांचा धनादेश देण्यात आला.