नागपूर : राज्यातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या स्थलांतरणाला केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाकडून सप्टेंबर महिन्यात परवानगी मिळाली. ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्रप्रकल्पातून तीन नर आणि पाच मादी असे आठ वाघ त्यासाठी जेरबंद करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दोन वाघिणी त्याठिकाणी स्थलांतरित करण्यात आहे. ते सह्याद्रीत स्थिरावल्यानंतरच पुढील वाघांचा प्रवास सुरू होणार आहे.

व्याघ्रगणनेच्या २०२२च्या अहवालात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात एकाही वाघाची नोंद नव्हती. त्यामुळे राज्याच्या वनखात्याने पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून सहा वाघांना सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सोडण्याची योजना आखली. हा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे गेला आणि दीड वर्षांपूर्वी प्राधिकरणाची परवानगी मिळाली. या प्रस्तावात तीनदा त्रुटी निघाल्या. त्या दूर करून पुन्हा हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. वाघाच्या स्थलांतरणासाठी याठिकाणी काम देखील सुरू करण्यात आले. २०२२-२३ मध्ये ५० चितळ सोडण्यात आले. त्यासाठी सुमारे दहा एकरचे कुंपण तयार करण्यात आले आणि याठिकाणी प्रजनन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. जेणेकरून संख्या वाढल्यानंतर ते चितळ व्याघ्रप्रकल्पात सोडता येतील.

जानेवारी २०१० मध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या या व्याघ्रप्रकल्पात वाघ नैसर्गिक स्थलांतर करून येतो, पण तो स्थिरावत नसल्याचा इतिहास आहे. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये स्थलांतर करून आलेला वाघ याठिकाणी स्थिरावला आहे. व्याघ्रप्रकल्पाचा भाग असलेल्या कोयना अभयारण्यात एक व चांदोली राष्ट्रीय उद्यानात दोन असे तीन वाघ आता याठिकाणी आहेत. २००८ पासून भारतात व्याघ्र स्थलांतर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

वाघांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण चूक नको…

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाने वाघ स्थलांतरणादरम्यान काही अटी घातल्या. यात प्रामुख्याने वनखात्याच्या देखरेखीखाली वाघ जेरबंद व त्याचे स्थलांतर काटेकोरपणे करण्यात यावे. यादरम्यान पुरेशी पशुवैद्यकीय काळजी घेण्यात यावी. मुख्य वन्यजीव रक्षकाने याचा संपूर्ण अहवाल सादर करावा. वाघांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी किंवा धोक्यात आणणारी कोणतीही चूक घडल्यास, मंत्रालयाने दिलेल्या परवानगीचा आढावा घेण्यात येईल किंवा ते रद्द करण्यात येईल.

जेरबंदीची प्रक्रिया अनुभवी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात…

ताडोबा-अंधारी आणि सह्याद्री या दोन्ही व्याघ्रप्रकल्पाचा भूप्रदेश वेगळा आहे. त्याचा अभ्यास झाला असला तरीही पहिल्या टप्प्यात ताडोबातील दोन वाघिणी सोडण्यात येणार आहेत. त्या स्थिरावल्यानंतरच पुढील वाघांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, याठिकाणी पाठवण्यात येणाऱ्या वाघिणी ओळखण्यात आल्या आहेत. त्यांच्या जेरबंदीची प्रक्रिया खात्यातीलच अनुभवी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात होईल. – एम.एस. रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

स्थलांतरणाच्या अटी..

  • २००८ मध्ये सारिस्का व्याघ्रप्रकल्पात तर २००९ मध्ये पन्ना व्याघ्रप्रकल्पात वाघाचे स्थलांतर करण्यात आले. हे दोन्ही प्रयोग यशस्वी ठरले. या स्थलांतरणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे वनखाते एक महत्त्वपूर्ण संवर्धन उपक्रम सुरू करण्यास सज्ज झाले आहे.
  • सह्याद्रीच्या या परिसरात रानगवा आणि मानव असा संघर्ष आहे. रानगवा हे वाघाचे खाद्य आहे आणि वाघ नसल्यामुळे याठिकाणी रानगव्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे याठिकाणी वाघ आल्यास रानगव्याच्या संख्येचा समतोल साधला जाईल आणि हा संघर्ष देखील कमी होणार आहे. सह्याद्रीचा ‘लँडस्केप’ वेगळा असला तरीही पहिल्यांदाच याठिकाणी वाघाचे स्थलांतरण करण्यात येत आहे.