नागपूर: बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसा पक्षाची घटना बनविली. मात्र, त्यानंतर ती पाळली गेली नाही. त्यामुळेच जुलै २०२२ मध्ये निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्षात मुख्यनेता पदाची घटनादुरूस्ती करण्यात आल्याचा दावा खासदार राहुल शेवाळे मंगळवारी केला. आमदार अपात्रता सुनावणीतील उलटतपासणी आज पूर्ण झाली.
हेही वाचा >>> “दारु प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, पुड्या खाऊन….”, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
ठाकरे गटाच्या दोन तर शिंदे गटाच्या पाच आमदारांची उलटतपासणी करण्यात आली असून दोन्ही गटाचे वकील सोमवारपासून तीन दिवस युक्तिवाद करणार आहेत. सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना कार्यालयीन सचिव विजय जोशी आणि शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार योगेश कदम, दीपक केसरकर आणि भरत गोगावले यांची साक्ष पूर्ण झाली आहे. या सर्वांनी मिळून एक हजारांवर प्रश्नांची उत्तरे दिली असून या आधारावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांच्यात १८ डिसेंबरपासून सलग तीन दिवस युक्तिवाद होईल.
हेही वाचा >>> कार्यकर्त्यांवर लाठीमार करत पोलिसांनी रोहित पवारांना घेतलं ताब्यात, पाहा VIDEO
पक्षाच्या घटनेनुसारच राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभेच्या बैठका व्हायला हव्या होत्या. तसेच पक्षांतर्गत निवडणुकाही झाल्या नाहीत. संघटनात्मक निवडणूक झाल्या नाहीत, असा दावा शेवाळे यांनी केला. तर सुरतला जाण्यावरून देवदत्त कामत यांनी आमदार गोगावले यांना प्रश्न केला, त्यावर शिवाजी महाराज तिथे गेले होते. ते चांगले शहर आहे म्हणून गेलो. गुवाहाटीच्या प्रवासाच्या खर्चावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले की, कामाख्या देवीचे दर्शन स्वत:च्या पैशाने घेणे उचित आहे. म्हणून आमच्या स्वत:च्या पैशाने गेलो होतो. तुमची मंत्री होण्याची इच्छा होती का असा प्रश्न देवदत्त कामत यांनी केला तेव्हा इच्छा होती पण अजूनपर्यंत मी मंत्री कुठे झालोय असे उत्तर देताच सभागृहात एकच हशा उसळला.