नागपूर : एकमेकांशी घट्ट मैत्री असल्याने नेहमी दोघेही सोबतच राहायचे. नेहमी एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. अशातच पैशाच्या कारणावरुन मित्रच मित्राचा वैरी बनला. जिल्ह्यातील पारशिवनी तहसीलमध्ये असलेल्या कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. गहुहिवरा रोडवरील पानतावने महाविद्यालयाजवळ भिवगडे ले-आऊटमध्ये राहणाऱ्या महेंद्र बर्वे यांची मित्रानेच हत्या केली असल्याचे समोर येत आहे. ही घटना रविवारी रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

महेंद्र बर्वे रात्री पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी आला नाही. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला आढळला. त्यांनी तातडीने कन्हान पोलीस स्थानकात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, ही हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली असल्याची शक्यता वर्तवली गेली.

महेंद्र नगरपालिकेत कंत्राटी कामगार होता आणि लोकांना व्याजाने पैसे देत होता त्यामुळेच त्याची हत्या झाली असावी, अशी शंका आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण  आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये संताप आणि अस्वस्थता असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडावे अशी मागणी केली जात होती. तपास सुरू करताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मृतकाच्या कुटुंबीय व मित्रपरिवाराची चौकशी केली. काही तासांतच पोलिसांनी मुख्य आरोपी तुषार राजेश गुरधे (कन्हान पिपरी) आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपींपैकी एक अल्पवयीन असल्याचे समजते.

व्याजाच्या पैशांवरून सुरू होता वाद

मृत  महेंद्र बर्वे आणि आरोपी तुषार गुरधे जवळचे मित्र होते. महेंद्र बर्वे हे व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत होते. या पैशांवरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच तुषारने आपल्या तीन मित्रांसह महेंद्र बर्वेची हत्या केल्याचे उघड झाले आहे. कन्हान पोलिसांनी आरोपींना अटक करून आरोपींचा पुढील तपास सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमामवाड्यात युवकाचा खून

गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपुरात आणखी एक हत्याकांड उघडकीस आले आहे. इमामवाडा परिसरातील जाततरोडी पोलीस ठाण्याच्या मागे एका वालदे नावाच्या युवकावर तीन आरोपींनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वालदे गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे.