गडचिरोली : भाजपने राज्यभरातील कार्यकारिणीत बदल करीत १३ मे रोजी जिल्हाध्यक्षांची घोषणा केली होती. संघटन पर्व अंतर्गत हे बदल करण्यात आले. मात्र, २२ जिल्ह्यांबाबत निर्णय राखून ठेवला होता. यात गडचिरोलीचाही समावेश होता. अखेर ३१ मे रोजी प्रदेश कार्यालयाने उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली. यात गडचिरोली भाजप जिल्हाध्यक्षपदी रमेश बारसागडे यांची नियुक्ती करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने पुन्हा ‘ओबीसी कार्ड’ खेळले, पण प्रशांत वाघरे यांच्या जागी बारसागडे यांच्या रुपाने नवा मोहरा दिला.

भाजप जिल्हाध्यक्षपदी कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ही प्रतीक्षा ३१ मे रोजी दूर झाली. प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी २२ जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली. लोकसभेसह तिन्ही विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, त्यामुळे संघटनात्मक पातळीवर बहुसंख्येने असलेल्या ओबीसींना संधी देण्याचा पायंडा आहे. काँग्रेसने जिल्हाध्यक्षपद कुणबी समाजातून आलेल्या महेंद्र ब्राम्हणवाडे यांना दिल्यानंतर भाजपनेही २० जुलै २०२३ रोजी प्रशांत वाघरे यांना जिल्हाध्यक्ष करुन कुणबी कार्ड खेळले होते. त्यांचा दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असताना जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया झाली. पक्षाने तेली समाजातून आलेल्या रमेश बारसागडे यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली.

मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे, माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, महिला जिल्हाध्यक्षा गीता हिंगे आदींनी त्यांचे स्वागत केले आहे.

निवडणुकीचे आव्हान

रमेश बारसागडे हे चामोर्शीतील शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. नंतर ते भाजपवासी झाले. २०१७ मध्ये त्यांनी कुनघाडा जि.प. गटातून भाजपकडून नशीब आजमावत विजय मिळवला. जि.प. मध्ये कृषी सभापतीपदही भूषविले. शांत, संयमी नेतृत्व म्हणून त्यांची पक्षात ओळख आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गटातटाचे राजकारणात जोमा

भाजपमध्ये गटातटाचे राजकारणात जोमात आहे. अशा परिस्थितीत जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश बारसागडे यांना सर्वांना एकसंध ठेऊन पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर बारसागडे यांच्यावर जबाबदारी आली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.