वर्धा : कोणत्याही कुटुंबात मुलांच्या आरोग्यास सर्वोच्च प्राधान्य दिल्या जाते. थोडे जरी आरोग्याबाबत खुट्ट झाले की पालक अस्वस्थ होत असल्याचे बघायला मिळते. मात्र आता आलेला अहवाल पालकांची झोप उडविणारा ठरू शकतो. राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र म्हणजेच नॅशनल हेल्थ सिस्टीम रिसॉर्स सेंटर या संस्थेने अहवाल मांडला आहे. संस्थेने देशभरातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. त्यात काही बाबी धक्कादायी दिसून आल्यात. संस्थेस दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयाचे सहकार्य लाभले.

अहवालतून स्पष्ट करण्यात आले आहे की, देशातील एक चतुर्थांश शालेय मुले पुरेशी झोप घेत नाही. यापैकी ६० टक्के विद्यार्थी हे डिप्रेशन म्हणजेच नैराश्यात गेलेले आहे. आकडेवारीनुसार २२. ५ टक्के मुलांना पुरेशी झोप मिळत नाही. ६५. ७ टक्के मुलांत संज्ञानात्मक कमकुवतपणा म्हणजेच विचार करण्याची व समजून घेण्याची क्षमता कमी होणे होय. ही बाब मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यास हानी पोहचवत आहे. झोपेचा अभाव म्हणजे केवळ थकवा नव्हे. तसेच आळस पण नव्हे. तर ते गंभीर मानसिक आणि बौद्धिक समस्यांचे मूळ ठरू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कमी झोप अन्य समस्या निर्माण करू शकते. म्हणजे एकाग्रता, भावनिक संतुलन व अभ्यासाच्या कामगिरीवर पण वाईट परिणाम करू शकते.

या अनुषंगाने नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य प्रा. डॉ. व्ही. के. पॉल हे म्हणतात की, आजच्या शैक्षणिक वातावरणात पुरेशी झोप झाली नाही की त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत जातो. त्याचे मूळ सवयीत आहे. सर्वात मोठी कारणे म्हणजे स्क्रीन टाइम, मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉप आणि टिव्हीसारखी उपकरणे. रात्री सोशल मीडियावर वेळ घालविणे व्हिडिओ गेम खेळणे, ऑनलाईन कंटेन्ट बघणे या बाबी मुलांच्या नैसर्गिक झोपेत अडथळा ठरतात. झोपणे व जागे होणे या साखळीत व्यत्यय येतो. झोप महत्वाचीच. मेंदूचे सक्षम कार्य, चांगली स्मरणशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती, चांगली शैक्षणिक कामगिरी यासाठी झोप आवश्यकच. प्रत्येक विद्यार्थ्याने रोज किमान ७ ते ८ तास झोप घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक संतुलन राखले जाईल, असे डॉ. पॉल स्पष्ट करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा अहवाल तयार करताना १२ ते १८ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी अभ्यासनात आले. त्यात शालेय किशोरवयीन मुलांच्या झोपेच्या सवयी व त्याचा परिणाम याबद्दल निष्कर्ष टाकण्यात आले आहे. झोपेचा अभाव असल्यास त्याचा मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न झाला. सर्वेक्षण करण्याचा तो मुख्य हेतू होता.