नागपूर : भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या लोकांना प्राधान्य दिले जात आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाच्या नव्या कार्यसंस्कृतीवर प्रहार केला. पक्षाच्या निष्ठावान कार्यकत्यांना अशाप्रकारे डावलल्या गेल्यास जेवढ्या वेगात पक्ष वरती जात आहे, तेवढ्याच वेगाने खाली आल्याशिवाय राहणार नाही, असा संतापही गडकरी व्यक्त केला. कळमेश्वर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी गडकरींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

अलिकडे सोलापूर येथे भाजप कार्यालयासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाहेरून येणाऱ्यांना संधी आणि निष्ठवान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याबद्दल आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर गडकरी यांचे वक्तव्य महत्वाचे आहे. व्यासपीठावर महसूल मंत्री चंद्रेशखर बावनकुळे, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार आशीष देशमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात गडकरी यांनी पक्षातील सध्याच्या घडामोडींवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “डॉ. राजीव पोतदार हे भाजपचे जुने, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्याबाबतीत न्याय करत नाही. ‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशी एक म्हण आहे. तशीच परिस्थिती पक्षात दिसते.

बाहेरून आलेले लोक सावजी चिकन सारखे जास्त गोड वाटतात, पण जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आयुष्य दिले आहे. त्यांच्याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. आता मी पक्षाच्या थेट संघटनात्मक जबाबदारीत नाही. तुम्हीच नेतृत्व करत आहात. पण, जर या जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले, तर तुम्ही ज्या वेगाने वर चढत आहात, त्याच वेगाने खालीही याल. त्यामुळे पक्षाने आपल्या मुळांशी जोडले गेलेल्या कार्यकर्त्यांना विसरू नये, असेही गडकरी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नगरपालिका निवडणुका झाल्यावर डॉ. पोतदार यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील. पोतदार यांच्या रूपाने भाजपला एक प्रामाणिक आणि समर्पित कार्यकर्ता लाभला आहे, हे विसरून चालणार नाही, असेही गडकरी म्हणाले.

दिवंगत भाजप नेत्याच्या मुलाला कंत्राट

भाजपचे दिवंगत नेते सोनबा मुसळे यांच्या मुलाला रेल्वे उड्डाणपूल तसेच कळमेश्वर येथील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. या कामांची गुणवत्ता उत्तम राखण्याच्या सूचनाही गडकरी यांनी दिल्या. मुसळे यांनी एकदा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, ते शासकीय कंत्राटदार असल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने वडिलांचा व्यवसाय सांभाळला असून आता त्याला महत्त्वाची कामे मिळत आहेत.