बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एक वृद्ध इसम नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला. ते वीस तासापासून बेपत्ता असल्याचे जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या सूत्रांनी सांगितले. आनंदा बळवंता साबळे ( वय 60, राहणार उटी, तालुका मेहकर ,जिल्हा बुलढाणा) असे पुरात वाहून गेलेल्या वृद्ध इसमाचे नाव आहे.  मेहकर तालुक्यातील जानेफळ परीसरातील उटी येथे शुक्रवारी ( दि. २१)  रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली.

सुमारे तासभर हा पाऊस कोसळला. यामुळे उटी परिसरातील नाल्याला मोठा पूर आला. दरम्यान आनंदा साबळे हे शौचास जात असताना त्यांचा पुलावरील पाण्याचा अंदाज  चूकला. यामुळे ते नालाच्या  पुरात वाहून गेले.

दरम्यान, गावकऱ्यांनी याची माहिती  जानेफळ पोलीस ठाणे आणि मेहकर तहफिल  कार्यालयाला दिली. सरपंच सुरेश काठोडे, गावकरी, साबळे यांचे सोयरे यांच्या मदतीने पोलीस आणि महसूल कर्मचारी यांनी आनंदा साबळे यांचा काल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला.मात्र साबळे यांचा थांगपत्ता लागू शकला नाही.

दरम्यान आज शनिवारी ( दिनांक बावीस) सकाळपासून पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र आज दुपारी अडीच वाजेपर्यंतही  पुराच्या पाण्यात वाहून गेलेले वृद्ध सापडून आले नाही. आपत्ती निवारण कक्ष आणि मेहकर तहसिल कार्यालयाने ही माहिती दिली.

हेही वाचा >>> नागपूर : एकटेपणातून नैराश्य; आयुष्याला कंटाळून वृद्ध पती-पत्नीने घेतला गळफास

सरासरी एकशेविस मिमी पाऊस

दरम्यान २१ जूनच्या रात्री पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. आज बावीस जून अखेरीस जिल्ह्यात सरासरी १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६१.६ मिलिमीटर च्या तुलनेत २२ अखेर जिल्ह्यात  सुमारे १६ टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील तेरापैकी अकरा तालुक्यात आजअखेर शंभर मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाने  हजेरी लावली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे  १६० मिमी तर त्या खालोखाल सिंदखेडराजा तालुक्यात १५५ मिमी पावसाची नोंद झाली. जळगाव जामोद तालुक्यात १५० लोणार मध्ये १४८ मिमी तर मेहकर मध्ये १०८ मिमी पाऊस झाला आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, शेतकरी चिंतातूर

बुलढाणा तालुक्यात १३७ मिमी, चिखली ११९ मिमी, शेगावात १०१,नांदुरा १०६, मोताळा १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान समाधानकारक पावसाने जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील खरीप पिकांच्या पेरण्यांना कमालीचा वेग आला आहे. कृषी केंद्रावर बी बीयाणे, खते खरेदी साठी  शेतकरी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. घाटावरील सहा तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे असल्याचे चित्र आहे. पाऊस उशिरा झाल्याने मूग आणि उडीदाच्या पेरा कमी होण्याची चिन्हे आहेत. या तुलनेत खामगाव मध्ये नव्वद मिमी तर संग्रामपूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ८६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या दोन तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिकांच्या पेरण्या जून अखेरीस देखील रखडल्या असल्याचे दुर्देवी चित्र आहे. यामुळे हजारो शेतकरी, शेतमजुर हवालदिल झाले असून त्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहे.