नागपूर : सणासुदीच्या काळात, उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने रेल्वेतर्फे विशेष गाड्या सुरू करण्यात येतात, पण या गाड्याही मोठ्या प्रमाणात रद्द केल्या जातात आणि अनेक गाड्यांना विलंब होत असल्याची बाब समोर आली आहे.

दरवर्षी दिवाळी, गणोत्सव, दुर्गा पूजा आणि छटपूजा तसेच उन्हाळ्यात रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. या गाड्या काही विशिष्ट कालावधीसाठी असतात. या गाडीला नियमित गाड्यांपेक्षा अधिक डबे असतात. बहुतांश वेळा या गाडीचे प्रवास भाडे अधिक असते. सणांच्या काळात आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये लाखो लोक आपल्या कुटुंबियांसह आणि प्रियजनांसह सण साजरा करण्यासाठी आपापल्या घरी परतत असतात. त्यामुळे रेल्वेगाड्यांची मागणी वाढते. नियमित गाड्यांमधून अचानक वाढलेल्या प्रवाशांना सामावून घेणे शक्य नसते. म्हणून ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोडण्यात येतात. परंतु अनेकदा या गाड्या रद्दही केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी गैरसोय अधिक होत असते.

हे ही वाचा… लोकजागर : कापूस, तूर आणि सोयाबीन…!

मध्य रेल्वेने जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एकूण १ हजार ५४४ विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात त्यापैकी २०२ रेल्वेगाड्या धावल्या नाहीत. शिवाय या विशेष गाड्यांना विलंब होत असल्याने प्रवाशांचा वेळ देखील वाया जातो आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आल आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात कालावधीत १ हजार १४६ विशेष गाड्यांना नियोजित वेळेेपेक्षा कित्येक तास विलंब झाला.

सणासुदीचा काळ हा भारतातील कौटुंबिक आणि सामुदायिक ऐक्याचे प्रतीक आहे. विशेषतः दिवाळी, गणोत्सव, आणि छठ पूजेसारख्या सणांसाठी महाराष्ट्रातील कोकण, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड राज्यांप्रमाणेच मोठ्या संख्येने लोक आपापल्या गावी किंवा शहरात जातात. या काळात गाड्यांमधील गर्दी इतकी जास्त होते की, सामान्य गाड्यांमधून प्रवास करणे जवळपास अशक्य होऊन बसते. भारतीय रेल्वे दरवर्षी या सणांसाठी विशेष गाड्यांचे आयोजन करते. विशेष गाड्या सुरू केल्याने काही प्रमाणात ही समस्या सुटते.

हे ही वाचा… नागपूरचा पालकमंत्री कोण? गडकरींनी सांगितले नाव…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेने जानेवारी २०२४ मध्ये १४४ विशेष गाड्या सुरू केल्या. त्यापैकी ५५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यात आणि १३९ विशेष गाड्यांना विलंब झाला. जून २०२४ मध्ये २०८ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आणि तब्बल ७६ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. सप्टेंबर २०२४ मध्ये १५२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. त्यापैकी ५३ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, असा तपशील माहिती अधिकारात प्राप्त झाला आहे.