लोकसत्ता टीम

नागपूर: संपकर्त्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेसह इतरही काही विभागांनी शिस्तभंग कारवाई करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. मात्र, कारवाईची भीती झुगारून दररोज मोठ्या संख्येने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून त्याचे प्रतिबिंब संविधान चौकात जमणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येवरून दिसून येत आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियमपासून कर्मचाऱ्यांची रॅली निघणार असून त्यात ५० हजार कर्मचारी उपस्थित राहतील, असा दावा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह इतर संघटनांनी केला आहे.

आणखी वाचा- तिसऱ्या दिवशी ९० टक्के कर्मचारी संपावर कायम, विद्यार्थ्यांचं शिक्षकांसाठी रास्ता रोको

मंगळवारपासून सुरू झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचा गुरुवारी तिसरा दिवस होता. बुधवारी जिल्हा परिषद, महसूल खात्याशी संबंधित कार्यालये व इतरही काही कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिस्तभंग कारवाईच्या संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात कारवाई केली जात आहे. शासनाकडून आदेश प्राप्त होताच नोटीस बजावल्या जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, नोटीसमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना असल्याचे चित्र संविधान चौकात दिसून आले. अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या नोटीस तेथे फाडून शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. नोटीसमुळे संपात सहभागी कर्मचाऱ्यांमध्ये एकजूट अधिक वाढत असल्याचेही दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संविधान चौकात तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांची प्रचंड उपस्थिती होती. त्यांच्या संख्येत रोज वाढ होत असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले यांनी सांगितले. शनिवारी यशवंत स्टेडियमपासून सकाळी ११ वाजता कर्मचाऱ्यांची रॅली निघणार असून त्यात पन्नास हजारावर कर्मचारी सहभागी होणार असल्याचे महल्ले यांनी सांगितले.