गडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) सरचिटणीस तसेच नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू याच्यासह इतर मृत नक्षलवाद्यांवर नारायणपूर पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याने कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. बसवराजूच्या कुटुंबीयांकडून त्याचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी करणारी याचिका आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. शनिवार, २४ मे रोजी याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाल्याने मृतदेहासाठी छत्तीसगड पोलिसांकडे मागणी करा, असे सांगून यासंदर्भातील दोन याचिका निकाली काढल्या. मात्र, छत्तीसगड पोलिसांनी परस्पर अत्यसंस्कार करीत न्यायालयाचा अवमान केल्याची चर्चा आहे.

२१ मे रोजी छत्तीसगडमधील अबुझमाड जंगल परिसरात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू ठार झाला. त्याच्यासोबत आणखी २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. नक्षलवाद्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा नेता चकमकीत ठार झाला. दरम्यान, बसवराजूचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीयांनी धडपड चालवली. एरवी पोलीस प्रशासन ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करतात. पण बसवराजूच्या प्रकरणात उशीर होत असल्याने त्याच्या नातेवाईकांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करून मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. यावर शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत याचिकाकर्त्यांना मृतदेहासाठी छत्तीसगड पोलीस प्रशासनाकडे जाण्याची सूचना केली. यावेळी छत्तीसगडचे महाधिवक्ता यांनीदेखील शनिवारपर्यंत शवविच्छेदन आणि तपासणी पूर्ण होणार असल्याचे सांगून लवकरच मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करणार, असे न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही याचिका निकाली काढल्या. परंतु आज, २६ मे रोजी नारायणपूर पोलिसांनी बसवराजूसह काही नक्षलवाद्यांचे मृतदेह नातेवाईकांना न देता त्यांच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केले. यावेळी पोलिसांनी बसवराजूचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते व माध्यम प्रतिनिधींना तिथे येऊ दिले नाही.

सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार

बसवराजूचे कुटुंबीय या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे व मानवाधिकाराचे उल्लंघन केले, असा आराेप बसवराजूचा भाऊ राम प्रकाश यांनी केला. सामाजिक कार्यकर्त्या बेला भाटिया यांनीदेखील, पाेलिसांनी नियमभंग केला असून याविराेधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा दिला.

अंत्ययात्रेच्या उत्सवी प्रथेमुळे पोलीस चिंतेत?

गडचिरोली, छत्तीसगडमध्ये चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपवल्यानंतर त्यांच्यावर शांततेत अंत्यसंस्कार पार पडतात. मात्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात मृत नक्षलवादी नेत्यांची अंत्ययात्रा वाजतगाजत काढण्यात येते. यावेळी नक्षलवाद्यांची गाणी वाजवली जातात, घोषणासुद्धा दिल्या जातात. हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येतात. इतकेच नव्हे तर राजकीय नेतेही या अंत्ययात्रेत सहभागी होतात. एखाद्या उत्सवाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्याच महिन्यात एका महिला नक्षलवाद्याच्या अंत्ययात्रेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात मोठ्या संख्येने एकत्र आलेले लोक आणि राजकीय नेते स्पष्ट दिसत होते. बसवराजू हा नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता होता. त्यामुळे त्याच्या अंत्ययात्रेतदेखील असेच काही घडेल, अशी शंका एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली होती.