अकोला : वीज चोरीचे प्रकरण अकोला परिमंडळात मोठ्या प्रमाणात होत आहे. २५ दिवसात महावितरणकडून २७५ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली. कारवाईअंती या वीज चोरांनी दोन कोटी ४१ लाख रुपयांची वीज चोरल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तडजोड शुल्क भरून वीज चोरीची रक्कम न भरणाऱ्या वीज चोरीच्या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आगामी काळात मोहीम तीव्र करण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहेत.
शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याची गरज दिसून येते. वीज चोरी पकडण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम राबवली. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान वीज चोरीच्या प्रकरणामध्ये मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर बंद पाडणे, मीटर दुरून बंद करण्यासाठी रिमोटचा वापर करणे, मीटरच्या मागच्या बाजूने छीद्र पाडत मीटरमध्ये रोध निर्माण करत मीटर बंद पाडणे किंवा मीटरची गती मंद करणे असे अफलातून प्रकार उघडकीस आले आहे.
अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी वीज चोरीला आळा घालण्यासाठी १ एप्रिलनंतर नियमित आणि तीव्र मोहिम राबवून वितरण हानी १५ टक्केपर्यंत चोरी कमी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यानंतर महावितरणकडून धाडसत्र राबवत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २४२ वीज चोरीच्या प्रकरणात विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून दोन कोटी २७ लाख ५१ हजार रूपयाचे दंड लावण्यात आले आहे. थेट वीज वाहिनीवर हूक टाकून वीज चोरी करणाऱ्यांची संख्या २३ असून त्यांना १० लाख ४० हजार रूपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. आठ प्रकरणात कलम १२६ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून तीन लाख २३ हजार रूपयाचे दंड ठोठावण्यात आला आहे.
यंत्रणेवर भार वाढल्याने बिघाड
वीज चोरीच्या अनधिकृत विद्युत भारामुळे विद्युत वाहकावर, रोहित्रावर त्याच्या मर्यादेच्या पलीकडे भार पडतो. परिणामी रोहित्रात बिघाड होतो. शॉर्ट सर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्याचा नाहक त्रास नियमित देयक भरणाऱ्या ग्राहकांवर होतो व महावितरणलाही त्याचा मोठा आर्थिक फटका बसतो. याशिवाय वीज पुरवठा खंडित झाल्यावर महावितरणला ग्राहकाच्या रोषाचा सामना करावा लागतो.