अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ति पक्षाने महायुतीला धक्का दिला आहे. मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा ठराव प्रहारच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेतला. पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडे प्रस्ताव सादर करून काँग्रेसला पाठिंब्याचा निर्णय घेतला जाईल. भाजपने प्रहारला गृहीत धरून दुर्लक्षित केल्याचा आरोप प्रहारच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता महायुती व महाविकास आघाडीतील कुरबुरी समोर येत आहेत. सुरुवातीला महायुतीमध्ये भाजपसोबत असलेल्या प्रहारने आता विरोधात भूमिका घेतली आहे. भाजपच्या वतीने नेहमीच गैरफायदा घेतला जातो. अमरावतीमध्ये नवनीत राणा व रवी राणा यांनी नेहमीच प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चिखलफेक केली.

हेही वाचा…पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते

राणा यांच्या उमेदवारीला विरोध असतांनाही भाजपने त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनाच संधी दिली. त्यामुळे प्रहारने अमरावती येथे उमेदवार उभा केला. अकोल्यात देखील प्रहार पक्षाच्यावतीने भाजपचा प्रचार केला जाणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना पाठिंबा देण्याचा ठराव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला. याचा प्रस्ताव बच्चू कडू यांच्याकडे पाठवला जाणार असून ते त्याची अधिकृत घोषणा करतील, असे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खा. सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी की स्वतःच्या?

बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष

अकोला जिल्ह्यात प्रहारचा चांगला प्रभाव असून एक ते सव्वा लाख पक्षाचे मतदान असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. लोकसभा निवडणुकीतील निकाल बदलवण्याची क्षमता प्रहारमध्ये असल्याचे देखील ते म्हणाले. प्रहार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या प्रस्तावावर बच्चू कडू काय भूमिका घेतात, याकडे लक्ष राहणार आहे.