नागपूर : तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेली प्रगती मानवस्नेही ठरू लागली आहे. सरकारी तपास यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन हे क्षेत्र तंत्रज्ञानापासून दूर राहिले नाही. सार्वजनिक तलाव, पर्यटनस्थळी पाण्यात बुडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी रिमोटवर चालणाऱ्या वॉटर क्राफ्टचा वापर केला जात आहे.
जिल्ह्यातील विविध तलाव व धरणे पावसाळ्यात पाण्याने भरल्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. मात्र, याच ठिकाणी नागरिकांकडून होणाऱ्या धाडसी कृतीमुळे दुर्घटनांची शक्यता वाढते आणि दरवर्षी अनेक जीव जातात. ऑगस्ट २०२४ मध्ये मकरधोकडा तलावात एका युवकाचा अशाचप्रकारे मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून आणि निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्या
मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन विभागाने मकरधोकडा तलावासाठी रिमोट कंट्रोल वॉटर क्राफ्ट खरेदी केला. हा एकप्रकारचा रिमोटने चालणारा वॉटर क्राफ्ट असून बुडणाऱ्या व्यक्तीला जलद मदत पोहोचवण्याचे काम करतो. पावसाळ्यात या क्राफ्टसह मनुष्यबळ तैनात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक ग्रामपंचायतीतील दोन युवकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना संबंधित कंपनीकडून मानधनही दिले जाणार आहे.
ग्रामपंचायत मकरधोकडा यांच्याकडे हे क्राफ्ट सुपूर्त करण्यात आले असून ९ एप्रिल रोजी त्याचे प्रात्यक्षिक व तपासणी मकरधोकडा तलाव परिसरात पार पडली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, नायब तहसीलदार श्री. वाडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील अन्य जलाशयांमध्येही अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.