राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर: वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर अधिक असल्याने या गाड्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता हळूहळू या गाड्याच्या प्रवाशांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे डबे कमी केल्याने ही गाडी बऱ्यापैकी भरून जात असल्याचे ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी दिसून येत आहे. मध्य रेल्वेने ऑगस्ट महिन्यातील वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रतिसादाबद्दलची माहिती दिली आहे. त्यानुसार बिलापूर ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या गाडीला १०४ टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते.

आणखी वाचा-पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट

तर नागपूर ते बिलासपूर दरम्यान ८६ टक्के, मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला ९५ टक्के, सोलापूर ते मुंबई दरम्यान ९४ टक्के, मुंबई ते गोवा-९५ टक्के, मुंबई ते शिर्डी-८० टक्के आणि शिर्डी ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला ७८ टक्के प्रतिसाद मिळाला आहे. नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद मिळत होता. या गाडीचे प्रवास भाडे ‘एसी थ्री टिअर’च्या धर्तीवर आहे. हे भाडे क्रयशक्ती कमी असलेल्या या भागातील प्रवाशांना परवडत नाही. त्यासंदर्भात प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु, अद्यापतरी प्रवास भाडे कमी करण्यात आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेने प्रवास भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर केली. पण ती अशा गाडीमध्ये दिली जाईल ज्यामध्ये संपूर्ण प्रवासादरम्यान किंवा एखाद्या विशिष्ट विभागात प्रवाशांची संख्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असेल. नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस डबे कमी करण्यात आले आहे. ही गाडी १६ डब्यांची होती. ती आता ८ डब्यांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता या गाडीला पुरेसे प्रवासी मिळू लागल्याचे दिसून येत आहे.