अकोला: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणारी शहानूर येथील जंगल व नरनाळा किल्ला सफारी १ मेपासून बंद झाली आहे. नरनाळा वन पर्यटन संघटनेच्या जिप्सी चालकांनी भाडेवाढ करण्याच्या मागणीसाठी बंद पुकारला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सफारी बंद असून पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. स्थानिकांचा रोजगार देखील बुडाला आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट वन्यजीव विभागामध्ये नरनाळा किल्ला व शहानूर येथील जंगलाचा समावेश आहे. नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी शहानूर येथे वन पर्यटन केंद्र असून त्या ठिकाणावरून नरनाळा किल्ला व शहानूर जंगलासाठी सफारी केली जाते. यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून ही सफारी बंद आहे. विविध मागण्यांसाठी नरनाळा वन पर्यटन संघटनेने संप पुकारला.

पेट्रोलचे वाढलेले दर लक्षात घेता व पर्यटन मार्गात नव्याने वाढ झाल्यामुळे शहानूर सफारीचे केवळ जिप्सी प्रवास भाडे अडीच हजारावरून चार हजार व नरनाळा किल्ला सफारीचे दीड हजारावरून अडीच हजार करण्याची मागणी संघटनेने केली. करोना काळामुळे बंद केलेली रात्रीची सफारी व पूर्ण दिवसाची सफारी सुरू करण्यात यावी, नरनाळा परिक्षेत्रातील बफर क्षेत्रात मचाण सुरू करावे, शहानूर सफारी द्वारावरील गाईड व जिप्सी चालक यांना गणवेश व ओळखपत्र द्यावे, शहानूर सफारी मार्गावरील खासगी सर्व वाहने बंद करण्यात यावी, शहानूर सफारी द्वार ते नरनाळा किल्ला दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण होत असल्यामुळे पावसाळ्यात नरनाळा किल्ला सफारी सुरु ठेवावी, जिप्सी गाईड व जिप्सी चालक यांना प्रशिक्षण देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने अकोट वन्यजीव विभागात ११ एप्रिलला देण्यात आले होते.

या मागण्यांची दखल न घेतल्यास १ मेपासून सफारी बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मागण्यांची दखल शासकीय पातळीवर घेण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन १ मेपासून शहानूर येथील सफारीसाठी बंद पुकारला. ऐन हंगामाच्या काळात पर्यटक व वन्यजीव प्रेमींची निराशा होत आहे. शिवाय स्थानिकांचा रोजगार देखील प्रभावित झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२६ जिप्सींचा चक्काजाम

शहानुर येथील द्वारावरून जंगल सफारी व किल्ला सफारीसाठी २६ जिप्सी उपलब्ध आहेत. पेट्रोलचे भाव वाढण्यासोबतच गाडीची दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करणे खर्चिक झाले. त्यामुळे या दरात सफारी पुरत नाही. भाडेवाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी १ मेपासून बंद पुकारला. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, मात्र कुठलाही तोडगा निघू शकला नाही, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र राठोड व सचिव चंद्रशेखर गायकवाड यांनी दिली.