नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे निमंत्रण काँग्रेचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नाकारले आहे. विजयादशमी उत्सवाचे निमंत्रण घेऊन घरी आलेल्यांचे स्वागत केले, मात्र कार्यक्रमाला येण्यास नम्रपणे नकार कळविला असल्याचे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले. आपण संघाच्या विचारांना मानत नाही, असे कारणही त्यांनी दिले. आंबेडकरवादी विचारांचा पगडा असलेले डॉ. राऊत यांनी आपण विचारांशी तडजोड करणार नाहीत, हे परत एकदा दाखवून दिले.

यावेळी बोलतांना डॉ राऊत म्हणालेत, मी तर दीक्षाभूमीचा कार्यकर्ता आहे, जय भीमचा कार्यकर्ता आहे संघभूमीचा नाही आणि ही माझी आमची लढाई जी आहे ते संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी अशी लढाई आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला समता नाकारणारी मनुस्मृती महत्वाची वाटते संघाने कायम तिरंग्याचा, संविधानाचा अपमान केलाय, अशी टीका देखील यावेळी डॉ. राऊत यांनी केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेच्या शंभराव्या वर्षानिमित्त यंदाचा विजयादशमी सोहळा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. २ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून, यंदाचे हे शताब्दी वर्ष असल्यामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप देण्यात आले आहे. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, संघाने यंदा काँग्रेस पक्षातील काही प्रमुख नेत्यांनाही या सोहळ्यासाठी औपचारिक निमंत्रण पाठवले आहे.

निमंत्रित काँग्रेस नेत्यांमध्ये नागपूरचे आमदार विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांचा समावेश आहे. संघाच्या बाजूने या निमंत्रणामुळे एक सर्वसमावेशक आणि संवादात्मक भूमिका घेण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. संघाच्या सूत्रांनीही याबाबत स्पष्ट केले आहे की, समाजातील सर्व स्तरांतील प्रतिनिधींना सहभागी करून विजयादशमी सोहळ्याला व्यापक स्वीकारार्हता मिळवून देण्याचा उद्देश आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संघाच्या विचारधारेशी स्पष्ट असहमती नोंदवत, या निमंत्रणाला नम्रपणे नकार दिला आहे. “संघ आणि काँग्रेसच्या विचारधारेत मूलभूत अंतर आहे. आम्ही धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता आणि संविधानाच्या मूल्यांवर ठाम आहोत. त्यामुळे अशा कार्यक्रमात सहभागी होणे योग्य ठरणार नाही,” असे राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

दुसरीकडे, विकास ठाकरे, विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदी यांनी अद्याप या निमंत्रणावर आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळासह स्थानिक माध्यमांचेही लक्ष लागले आहे. काँग्रेस पक्षाच्या आतून यावर कोणती प्रतिक्रिया येते आणि स्थानिक तसेच राज्य पातळीवरील नेते या निमंत्रणाकडे कसे पाहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.