बुलढाणा : खरीप हंगाम तोंडावर आला असताना व पूर्वतयारी सुरु असताना पीक कर्ज वाटपाची गती मंदावली आहे. यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाल्याचे आज दिसून आले. जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात आज शिवसेनेने रस्त्यावर उतरत बँकांच्या उदासीनतेचा निषेध केला. तसेच जिल्हाधिकारी किरण पाटील यांची भेट घेत कर्ज वाटपची गती न वाढल्यास ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन करण्याचा इशारा दिला.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामोर हे आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यानी कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्याची विदारक स्थिती जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या समक्ष मांडली. मायबाप शेतकरी शेती मशागतीची काम आटोपती घेत असून खरीप पेरणी हंगाम तोंडावर आलेला आहे. मात्र असे असतानाही हक्काच्या पिक कर्जापासून शेतकरी अद्यापही अपेक्षित आहे.
उद्दिष्ट पूर्तीच्या तुलनेत १०टक्केच्या आतच कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अन्यथा शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागेल असा इशाराच जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला .खरीप पेरण्या तोंडावर आल्या आहेत. या हंगामासाठी जिल्ह्यात जवळपास साडेसात लाख हेक्टर च्या वर पीक लागवड होणार असल्याचे आकडेवारी सांगते. दुसरीकडे या हंगामासाठी सामोरे जाताना मायबाप शेतकरी मात्र आर्थिक दृष्ट्या संकटात आहेत.
अस्मानी संकटांची मालिका एका बाजूला सुरू असताना गत हंगामातील उत्पादनाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे ही शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा आहे. पेरणीच्या हंगामात संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून बँकांमार्फत पीक कर्ज देण्यात येते. यंदाच्या १५०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप उद्दिष्ट असताना त्या तुलनेत आतापर्यंत १५० कोटीच्या आताच कर्ज वाटप झाल्याचे वास्तव आहे. ही टक्केवारी दहा टक्क्याच्या आतच आहे. बँकांकडून एनवेळी होणारी कागदपत्रांची मागणी आणि त्यातून होणारा उशीर हा नेहमीचाच विषय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने बँक अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक घेऊन त्यांना सूचना करण्यात याव्यात.
वेळेप्रसंगी नियमानुसार कारवाईचा बडगा दखील उगारण्यात यावा. सोबतच सर्कल निहाय पीक कर्ज वाटपाचे मिळावे घेण्यात यावेत, जेणेकरून पीक कर्ज वाटपाची गती वाढेल अशी सूचनाही बुधवत यांनी मांडली. निवेदन देताना महीला आघाडी जिल्हा प्रमुख चंदा बढे, उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे, लखन गाडेकर, विजय इंगळे, अरुण पोफळे, विजय इतवारे, समाधान बुधवत, गजानन उबरहंडे, अशोक गव्हाणे, सुधाकर आघाव, सुमित सरदार, मोहम्मद सोफियान, एकनाथ कोरडे, रामदास वाघ, अनिकेत गवळी, बबन खरे, श्याम खडके, शेषराव साळवे, दिपक पिंपळे, सदाशिव बुधवत, दगडूबा पिंपळे ,गजानन पाटील तायडे, गणेश पालकर, मधुकर महाले, हरिभाऊ सिनकर,रामेश्वर बुधवत, भगवान नरोटे, भागवत शिकारे. किशोर कानडजे.मोहित राजपूत,राहुल जाधव. श्रावण बोरकर, आशिष थोरगन. सचिन जाधव, संतोष राजपूत.मोहन तायडे, जोशी महाराज, रुपेश लडके, संजय चोरमुले, सुभाष भोपळे, अंबादास कदम, सतिश धंदर ,पुरुषोत्तम कन्हेर, यांचेसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
‘आंदोलन अटळ’
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर संतप्त शिवसैनिकांनी मुख्य प्रवेद्वारावर निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. जिल्हा प्रमुख बुधवत यांनी, प्रशासन आणि राष्ट्रीयकृत व अन्य बँकाची पीक कर्ज बाबत अडवणूकीची भूमिका अशीच राहिली तर शिवसेनेचे तीव्र आंदोलन अटळ असल्याचा इशारा पुन्हा दिला. खरीप हंगामासाठी खते व बी बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा, बोगस बियाणे आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भरारी पथके आणि समित्यांना स्थानिक पातळीवर सतर्क करावे, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळपीक बागायतदारांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी या मागण्याकडेही शासन व प्रशासन यांचे लक्ष वेधले.