गडचिरोली : धानोरा तालुक्यातील खेडेगाव येथील रहिवासी असलेला शुभम तुलावी याने यूपीएससी उत्तीर्ण केल्याचा दावा खोटा निघाला आहे. निकालपत्रात नाव असलेला हा गडचिरोलीचा शुभम नसून तो शुभम प्रसाद आहे. गेल्या आठवड्यात यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर शुभम तुलावी याने ही परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दावा त्याचे शिक्षक असलेले काका काकू आणि वर्गशिक्षकाने केल्यामुळे विविध आदिवासी संघटना तसेच चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा सत्काराही केला होता. ‘लोकसत्ता’तही यासंदर्भात बातमी प्रकाशित झाली होती. मात्र, हा दावा खोटा निघाल्याने सर्वच बुचकळ्यात पडले आहे.
शुभम तुलावी हा खेडेगाव (ता. धानोरा) येथील सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील आहे . त्याचे वडील ईतवारी तुलावी हे सार्वजनिक बांधकाम विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी होते. ते आता निवृत्त झाले आहेत. आई अमरबाई अल्पशिक्षित आहे. शुभमचे काका जगनसाय व काकू माया हे शिक्षक आहेत. शुभमचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जि.प. शाळेत झाले. पाचवीनंतर ते बारावीपर्यंतचे शिक्षण ब्रम्हपुरी (ता. चंद्रपूर) येथे पूर्ण केले. पुढे काका जगनसाय व काकू माया यांनी त्यास पाठबळ दिले. शुभम तुलावी याने बारावीनंतर नागपूर येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे चंदीगड येथून त्याने बी.
टेक पदवी संपादन केली. त्यानंतर तो यूपीएससीकडे वळला. शिकवणीसोबतच स्वअध्ययन करून तयारी केली. मात्र, तो उत्तीर्ण होऊ शकला नाही. गेल्या आठवड्यात यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर निकाल पत्रात केवळ शुभम असे नाव होते. त्यासमोर परीक्षा क्रमांकही होता. तरीसुद्धा कुठलीही शहानिशा न करता शुभम आणि त्याच्या शिक्षक काका काकूंनी तो उत्तीर्ण झाल्याची बतावणी केल्याने त्याचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. याची दखल घेत माध्यमांनी देखील त्या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी शुभमला संपर्क केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. मात्र, त्याचे वर्गशिक्षक असलेल्या पेंदाम यांनी दुजोरा दिला.