वाशिम : जसे जग बदलले तसेच प्रेमाचे रंग, रुपही बदलले. सिल्वासा येथे कंपनीत असताना रिसोडच्या मुलाचे बिहारच्या मुलीशी प्रेमसंबध जुळले. आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्ने रंगली. परंतु दोघांच्याही जाती आडव्या आल्या. दोघेही पळून रिसोडात रहायला आले. मात्र, मुलींच्या घरच्यांनी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा सिल्वासा येथे दाखल केला. पोलीस पथक रिसोडात पोहचले. त्या दोघांचाही शोध घेतला. त्यांना रिसोडच्या पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. मुलगी अल्पवयीन असल्याने प्रेमबंधनात अडकण्याएैवजी ते पोलीसांच्या बेडीत अडकले. १० जानेवारी रोजी पोलीस दोघांनाही घेऊन सिल्वासाला गेले. रिसोड शहरातील बसस्थानक परिसरातील एक तरुण दमणच्या सिल्वासा येथे मजुरीच्या कामासाठी गेला होता. तिथे एका कंपनीत काम करताना उत्तर प्रदेशातील मुलीच्या प्रेमात पडला. दोघांचे प्रेम प्रकरण वर्षभर चांगलेच बहरले. सात जन्माचे वादे करण्यात आले. परंतु धर्म आणि जातीच्या अडथळ्यांमुळे दोघेही लग्न करू शकत नव्हते. यामुळे दोघांनीही घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि डिसेंबर महिन्यात ते प्रेमीयुगुल रिसोडला पोहोचले. तिकडे सिल्वासा येथे मुलीच्या पालकांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली. हेही वाचा >>> अमरावती : ऑनलाईन प्रेमाचा फास! ‘त्याने’ आत्महत्येचा बनाव केला, तिने इकडे खरंच गळफास घेतला… प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सिल्वासा पोलीस १० जानेवारी रोजी रिसोडच्या पोलीस ठाण्यात पोहचले. रिसोड पोलिसांच्या मदतीने त्यांनी दिवसभर त्या प्रेमीयुगुलाचा शोध घेतला. दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आवश्यक ती सर्व कारवाई करून सिल्वासा पोलीस रात्री उशिरा प्रेमी युगुलासह निघून गेले. 'त्या' कागदपत्राने केला घोळ ते प्रेमीयुगुल सिल्वासा येथून पळून रिसोडात आले. मुलीने शाळा सोडल्याच्या दाखल्यावर तिचे वय १८ वर्षाचे होते. परंतु सिल्वासा पोलिसांकडे असलेल्या कागदपत्रावर ती अल्पवयीन असल्याने मुलगा चक्रावून गेला. ती युवती अल्पवयीन असल्याने सिल्वासा पोलीस त्या दोघांनाही घेऊन निघून गेले.