बुलढाणा : मे महिना म्हणजे उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमान. पारा ४० अंश सेलसियसच्या वरच, अंगाची लाहीलाही, त्रस्त झालेले नागरिक, असे भीषण चित्र या महिन्यात पहायला मिळते. मात्र यंदाच्या मे महिन्यात दररोज पडणारा पाऊस, वादळी वारे, विजांचे थैमान, असे चित्र पहायला मिळाले. मे महिन्यातील या वळवाच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. मागील १ मे पासून बुलढाणा जिल्ह्यात तळ ठोकून असलेल्या वळवाच्या पावसाने जिल्ह्याची दाणादाण उडवली. सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. तसेच विज कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला असून हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. याशिवाय मुक्या जनावरांचे बळी गेले असतानाच मोठ्या संख्येने घरांची पडझड झाली. निसर्गाचे संतुलन ढासळल्यामुळे उन्हाळ्यात देखील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे.
आज २७ मे अखेर जिल्ह्यातील २७७७ हेक्टरवरील रब्बी पिके, कांदा, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. यातही एकट्या २२ मे रोजी काही तासातच दीड हजारावर (१५९७) हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. २१ तारखेला ६६० हेक्टरवरील पिकांची हानी झाली. मागील २ मेपासून सुरू झालेल्या विजेच्या तांडवात तीन जणांचा बळी गेला. यामध्ये एक बालक, महिला व वृद्धाचा समावेश आहे. याशिवाय ३१ मोठी आणि दोन लहान पाळीव जनावरे दगावली. यामुळे पशुधनाची मोठी हानी झाली. यातही १५ ते २१ मेदरम्यान तब्बल १५ पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला.
चार तालुक्यांत पावसाची शंभरी
आज २७ मे अखेर जिल्ह्यात पावसाळ्याप्रमाणे जोरदार पावसाची नोंद झाली आहे. सिंदखेड राजा १६६ मिमी, देऊळगाव राजा १३६ मिमी, लोणार १३६ मिमी, शेगाव १११ या चार तालुक्यात पावसाने शतक गाठले. जळगाव ९६ मिमी, चिखली ८६, बुलढाणा ७६, खामगाव ८९ मिमी, नांदुरा ७९ मिमी पावसाने हजेरी लावली. उर्वरित मोताळा, मलकापूर, संग्रामपूर या तालुक्यांतही सरासरी ५० मिमी पावसाची नोंद झाली.
एप्रिल महिन्यात १६६ गावांना फटका
यापूर्वी मागील २ आणि ३ एप्रिल २०२५ रोजी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने रब्बी पिके आणि फळ, भाजीपाला वर्गीय पिके यांचे मोठे नुकसान केले. तसेच भौतिक नुकसानदेखील झाले. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ४ हजार १८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. नऊ तालुक्यांना अवकाळीचा फटका बसला होता. नांदुरा तालुक्यातील तब्बल ४९ गावांना अवकाळीचा तडाखा बसला. गहू, मका, ज्वारी, कांदा, पपई, केळी, यांसह भाजीपाला पिकांची नासाडी झाली होती. संग्रामपूर तालुक्यातील ५९९ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. तालुक्यात मका, गहू, ज्वारी, भाजीपालाची हानी झाली होती. केळी, संत्रा, लिंबू, भुईमूग, फळबागाची हानी झाली. यापाठोपाठ मे महिन्यातही अवकाळीने जिल्हा व शेतकऱ्याना पुन्हा फटका दिला.