गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेवर काही अधिसभा सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने ही प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठ प्रशासनाने मुलाखतीनंतर निवड करण्यासाठी घेतलेला दोन महिन्यांचा कालावधी आणि निवड यादी प्रकाशित करण्यास केलेली टाळाटाळ यामुळे ही प्रक्रिया खरंच पारदर्शक पार पडली का? असा प्रश्न अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला आहे.

४ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध जाहिरातीनुसार मराठी, रसायनशास्त्र, इंग्रजी, गणित, संगणकशास्त्र, जनसंवाद, अर्थशास्त्र, व्यवस्थापनाशास्त्र आदी विषयांसाठी सहायक प्राध्यापकांच्या निवडीसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. जाहिरातीनुसार एससी १, व्हीजे ए १, एनटी- बी १, एनटी-सी २, एनटी-डी १, एसबीसी १, ओबीसी ९ ईडब्लूएस ३ व खुला प्रवर्गाच्या ११ अशा जागा होत्या. यासाठी बाराशेपेक्षा अधिक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या होत्या.

हेही वाचा… आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणतात, आदिवासीमध्ये नवीन जातीचा समावेश नाही

तब्बल महिनाभर चाललेल्या मुलाखतीनंतर दोन महिन्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना ‘मेल’ पाठवून कळविण्यात आले. परंतु कोणतीही निवड यादी प्रकाशित करण्यात आली नाही. त्यामुळे निवड न झालेल्या उमेदवारांना आपल्याला किती गुण मिळाले व प्रतिक्षा यादी संदर्भात कळू शकले नाही. परिणामी समाज माध्यमावर काहींनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. माध्यमांमध्येदेखील या भारती प्रक्रियेवर शंका उपस्थित करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे अधिसभा सदस्य प्रा. दिलीप चौधरी व प्रा.निलेश बेलखेडे यांनी कुलगुरूंना निवेदन देत याविषयी विचारणा केली आहे. सोबतच निवड प्रकियेसंदर्भातील काही कागदपत्रांची मागणी केली आहे. यात निवड यादी, निवड समिती सदस्यांनी दिलेल्या गुणांकनाचे गुणपत्रक, मुलाखतीची चित्रफीत आदींचा समावेश आहे.

प्रक्रिया नियमानुसारच- कुलगुरू

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकारपरिषदेत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना पत्रकारांनी याविषयी प्रश्न केला असता त्यांनी सहायक प्राध्यापक पदभरती प्रक्रिया ही यूजीसीच्या नियमानुसारच व पूर्णता पारदर्शकपणे करण्यात आली आहे, असे स्पष्ट केले.

सदर पदभरती प्रक्रियेबाबत उमेदवारांच्या काही तक्रारी असतील ते त्यांनी सादर कराव्या तक्रारींच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या वतीने चौकशी करण्यात येईल, असेही कुलगुरू डॉ. बोकारे यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवड यादी प्रसिद्ध करण्यास हरकत काय?

विद्यापीठ कायदा परिनियमनानुसार भरती प्रक्रियेत मुलाखतीनंतर चोवीस तासात निकाल जाहीर करावे अशी तरतूद आहे. त्यामुळे विद्यापीठाने सहायक प्राध्यापक भरतीची निवड यादी प्रसिद्ध करायला पाहिजे होती. त्यामुळे या भरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी आम्ही प्रकियेसंदर्भातील माहिती मागितली आहे. – प्रा. दिलीप चौधरी, अधिसभा सदस्य, गोंडवाना विद्यापीठ