लोकसत्ता टीम

बुलढाणा : मागील वर्षीच्या जुलै ते ऑगस्ट महिन्यात ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे विदर्भातील संत्री पिकाचे मोठे नुकसान झाले होते. झालेल्या हानीबद्दल विशेष बाब म्हणून राज्य शासनाने विदर्भातील चार जिल्ह्यांतील नुकसान झालेल्या संत्री उत्पादक शेतकऱ्यांना १६५ कोटी ८३ लाखांची मदत देण्यास मंजुरी दिली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने ही मदत मंजूर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही निवड झाल्यानंतर पाटील यांनी या निर्णयाद्वारे बुलढाणा जिल्ह्याला ‘सप्रेम भेट’ दिल्याचे बोलले जात आहे. संत्री फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून मदत देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ३ हजार ८५२ शेतकऱ्यांचे २६२६.८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून ९४५.६५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली.

आणखी वाचा-नागपूर : मुलीचा चक्क वडिलांवर बलात्काराचा आरोप, कारण वाचून बसेल धक्का…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे ऑगस्ट २०२४ मध्ये ५ हजार ९३३ शेतकऱ्यांचे ३०१३.८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १०८४.९८ लाख रुपये मदत देण्यास मंजुरी मिळाली. जुलै ते ऑगस्ट २०२४ कालावधीत अमरावती जिल्ह्यातील ४१ हजार ९११ शेतकऱ्यांचे ३७३९३.९७ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा फळाची अतोनात नासाडी झाली होती. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १३४६१.८३ लाख रुपये मदतीस मंजुरी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील ३ हजार ४३३ शेतकऱ्यांचे ३०२९.५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १०९०.६२ लाख रुपये मदतीस मान्यता देण्यात आली.