लोकसत्ता टीम

अकोला: शहरातील जुने शहर भागात समाजमाध्यमातील पोस्टवरून दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेत एकाचा मृत्यू तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. अनेक वाहनांची तोडफोड झाली. त्यात चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आहे.

दंगलीतील अनेक लोकांना अटक करण्यात आली असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमातील पोस्टवरून दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटातील लोकांचा मोठा जमाव चालून आला. रात्री उशिरापर्यंत दगडफेक होऊन हरिहर पेठ भागात चारचाकी, रिक्षा, दुचाकी वाहनांची तोडफोड अन् जाळपोळ केली.

आणखी वाचा- गडचिरोली: कळपातून भरकटलेल्या रानटी हत्तीचा जारावंडीत धुडगूस

परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी अकोला पोलिसांची प्रचंड धावपळ झाली. घटनेची माहिती मिळताच रात्री भाजप आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल तसेच जिल्ह्यातील आणि बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थितीवर तात्काळ नियंत्रित मिळण्यात यश यावे, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला दिल्या.

जमाव नियंत्रणात येत नसल्याचे पाहून पोलिसांकडून जमावांवर अश्रूधुराचा वापर करण्यात आला. अमरावतीहून पोलीस दलाच्या तुकड्या हजर झाल्यानंतर रात्री उशिरा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. संपूर्ण घटनेत आठ लोक जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन पोलीस जखमी आहेत. आतापर्यंत २६ लोकांना अटक करण्यात आली आहे. समाजाविरोधात पोस्ट करणारा आरोपी देखील अटकेत आहे, अशी महिती पोलिसांनी दिली.

आणखी वाचा- बुलढाणा : ‘त्या’ सहा वर्षीय बालिकेचा अखेर मृतदेहच आढळला; दगडाने ठेचून हत्या, समाजमन सुन्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या अकोला पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त आहे. काल रात्रीच जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशानं अकोला शहरात कलम १४४ लागू करण्यात आला असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. सर्व नागरिकांनी शांततेत राहावे, तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, परिस्थिती नियंत्रणात आहे, असे आवाहन भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.