वर्धा : बहुचर्चित भाजप जिल्हाध्यक्ष अखेर जाहीर करण्यात आले. पक्षाच्या संघटनात्मक रचनेनुसार महाराष्ट्रात ८० जिल्हे तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ५२ जिल्हाध्यक्ष घोषित करण्यात आले होते. उर्वरित २८ शिल्लक होते. ते केव्हा, असा प्रश्न चर्चेत होता. अखेर आज हे जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यात आले.
वर्ध्यात फेरबदल झाला. विद्यमान अध्यक्ष सुनील गफाट यांना पुन्हा संधी नाकरण्यात आली. आता संजय गाते हे नवे जिल्हाध्यक्ष होतील. विदर्भात काही नवे जिल्हाध्यक्ष घोषित करण्यात आले आहेत. त्यात गडचिरोली रमेश बरसागडे, चंद्रपूर शहर सुभाष कसमगुटवार, चंद्रपूर शहर हरीश शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.तसेच पश्चिम महाराष्ट्रात पूर्व दक्षिण बारामती शेखर वढणे व कोल्हापूर विजय जाधव. तसेच अन्य राहिलेले जिल्हाध्यक्ष आज जाहीर करण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात चमत्कार घडला, अशी प्रतिक्रिया आहे. नव्याने घोषित वर्धा जिल्हाध्यक्ष संजय गाते हे संघाचे जुने कार्यकर्ते म्हणून परिचित आहे. त्यांना एका महामंडळाचे अध्यक्षपद पण देण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य कुणबी किंवा तेली या समाजातील अध्यक्ष देण्यापेक्षा अन्य समाजातील अध्यक्ष देण्याची मागणी पुढे आली होती. म्हणून अन्य नावे स्पर्धेत आली.
आमदार दादाराव केचे यांनी गफाट यांच्या नावास विरोध केला होता. तसेच महिला जिल्हाध्यक्ष नकोच, हा सूर आला. या घडामोडीत नवे समीकरण उदयास आले . पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर व माजी खासदार रामदास तडस ही युती पुढे आली. गाते यांना संधी का नको, हा प्रश्न समोर आला. भोयर, तडस, केचे हे गाते यांच्या नावास अनुकूल झाले. पालकमंत्री भोयर यांनी पण दुजोरा दिला आणि गाते फायनल झाले, अशी चर्चा आहे.
गफाट म्हणतात की, भाजप हा दबावात काम करणारा पक्ष नाही. योग्य व्यक्ती पदावर यावी, हे सूत्र असते. मला सर्वांनी समर्थन दिले होते, अशी माहिती आहे. पण आणखी काही विचार असेल म्हणून मी पुन्हा अध्यक्ष झालो नसेल. पण नवीन अध्यक्ष गाते हे पण सक्षम भाजप पदाधिकारी आहेत. माझे त्यांना सर्व ते सहकार्य राहील, आणि मी पक्षाने दिलेले काम करणार. आम्ही भाजप कार्यकर्ते आहोत. पद आमच्यासाठी महत्वाचे नाही.
मात्र या निमित्त्याने जिल्हा भाजपत पालकमंत्री भोयर व रामदास तडस हे नवे प्रभाव केंद्र तयार झाल्याचे चित्र पुढे आले आहे. अन्य चार आमदार व प्रभावी नेते मागे पडलेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष नेमणार, अशी चर्चा होती. पण आता संजय गाते यांना नेमून प्रभाव कसा पाडायचा, याबाबत काय विचार झाला, अशी प्रश्नार्थक चर्चा आहे.