अकोला : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण उपक्रमास सुरुवात झाली. आता या सर्वेक्षणासाठी एकूण एक हजार गुणांची मूल्यांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन १२० गुण, ग्रामस्थांचा प्रतिसाद व मानसिकतेतील बदल १०० गुण, स्वच्छता सुविधांचा वापर २४० गुण व प्रत्यक्ष निरीक्षण व प्रश्नावली ५४० गुण असे एकूण एक हजार गुणाचे मूल्यांकन राहणार आहे. केंद्रीय पथकाच्या माध्यमातून तपासणी केली जाणार असून निकष अधिक कठोर करण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ चा राज्यस्तरीय प्रारंभ झाला. आता जिल्हास्तरावर या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये गावांतील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून त्यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृष्यमान स्वच्छता, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, खतखड्डे, प्लास्टिक संकलन व त्याचे व्यवस्थापनाची पाहणी करण्यात येणार आहे. यादरम्यान घरोघरी भेट देऊन नागरिकांच्या स्वच्छतेविषयक सवयी, शौचालय वापर, कचरा व्यवस्थापन, हात धुण्याच्या सवयी, तसेच परिसरातील एकूण स्वच्छतेचा आढावा घेतला जाईल.
यासोबतच शाळा, अंगणवाडी, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक शौचालये या सारख्या सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छता राखलेली आहे का? याचीही पडताळणी केली जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हा केवळ स्वच्छता विभागाशी संबंधित नसून त्यामध्ये पंचायत विभाग, शिक्षण, आरोग्य, एकात्मिक बाल विकास विभाग, पाणी पुरवठा या विभागांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाच्या माध्यमातून गावात तपासणी होत असतांना सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवणे अपेक्षित आहे.
६८१ गावांमध्ये स्वच्छता तपासणी
वाशीम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या ६८१ गावांमध्ये स्वच्छता विषयक तपासणी होणार आहे. या सर्वेक्षणाला सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समित्या आणि ग्रामस्थांनी एकजुटीने सामोरे जावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक श्रीराम कुळकर्णी, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंदरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, महिला व बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर यांनी केले आहे.