यवतमाळ: राज्यभरात २ जूनपासून सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी शिक्षक प्रशिक्षणात नियोजनाअभावी शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. प्रत्यक्षात शिक्षकांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे.

ज्या शिक्षकांना सेवेत १२ वर्षे झाले त्यांचे वरिष्ठ श्रेणी व ज्यांना २४ वर्ष झाले त्यांचे निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू आहे. यापूर्वी राज्य व जिल्हास्तरावर हे प्रशिक्षण झाले. आता तालुका स्तरावर १० दिवसांचे हे प्रशिक्षण सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार १६६ शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी आहे. मात्र प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींनी शिक्षकांना त्रस्त केलं. सर्व्हर डाऊन होणे, स्क्रीन फ्रीझ होणे, प्रश्नपत्रिका लोड न होणे आणि ‘सबमिट’ बटण निष्क्रिय होणे या त्रुटींमुळे हजारो शिक्षक परीक्षाच पूर्ण करू शकले नाहीत.

जे शिक्षक ऑनलाइन हजेरी लावणार नाहीत, ते प्रशिक्षणातून बाद होणार असल्याने शिक्षक धास्तावले आहे. शिवाय शासनाने प्रशिक्षणाची परीक्षा वेळेत न दिल्यास प्रशिक्षण रद्द करण्याची सक्ती केली आहे, जी शिक्षकांना मानसिक छळ करणारी आहे, अशी तक्रार शिक्षकांनी केली आहे. प्रशिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाकडून दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात आले. तरीही प्रशिक्षणकेंद्रांवर प्राथमिक सुविधांचा पूर्ण अभाव आहे. अनेक केंद्रांवर चहा-पाण्याची देखील व्यवस्था नसल्यामुळे अनेक शिक्षक तहानलेलेच राहिले. याशिवाय, शिक्षकांना त्यांच्या मूळ तालुक्याऐवजी ८० ते ९० किलोमीटर लांबच्या तालुक्यांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यामुळे प्रवासाचा ताण, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भार शिक्षकांवर पडत असून यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याची ओरड शिक्षकांमध्ये सुरू आहे.

उर्दू माध्यमातील शिक्षकांवरही अन्याय झाल्याचा आरोप होत आहे. त्यांना उर्दू मातृभाषेतून प्रशिक्षणाची सोय नाही. त्यामुळे त्यांना मराठीतून प्रशिक्षण देण्यात येत आहे. अभ्याससामग्रीचा अभाव आणि भाषिक अडचणींमुळे या शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

या सर्व परिस्थितीमुळे राज्यभरात शिक्षकांमध्ये शासनाच्या विरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद, पुणेचे संचालक राहुल रेखावार आणि उपसंचालक माधुरी सावरकर यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा शेख अब्दुल रहीम यांनी दिला आहे. या प्रशिक्षणाच्या नावावर होणारा शिक्षकांचा अपमान थांबवून नियोजनबद्ध आणि मानवतेशी सुसंगत प्रशिक्षणाची देण्याची व्यवस्था शिक्षण विभागाने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.