नागपूर: वर्धा, सोनेगाव, हिंगणघाट, नागपूर, वरोरा, येथील नागरिक मोठ्या संख्येने चंद्रपूर-बल्लारशा येथून निघणाऱ्या ‘मेमू रेल्वे’ने प्रवास करतात. यामध्ये महिला व विद्यार्थिनींचा समावेश आहे. बल्लारशा येथून दररोज सायंकाळी पाच वाजता सुटणारी बल्लारशा वर्धा मेमू रेल्वे १७ ऑक्टोबरपासून दररोज दोन ते चार तास उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिलांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही रेल्वे वेळेत सोडण्यात यावी, अशी मागणी ‘वी फॉर चेंज’ या संघटनेने केली आहे.

विद्यार्थिनी आणि महिला रेल्वेस्थानकावर किमान तीन तास थांबत असल्याने काही मवाली, गुंड त्यांच्याशी गैरवर्तन करतात, त्यांची छेड काढताना दिसतात. प्रवासी मुली तक्रार करायला घाबरतात. हे चित्र चंद्रपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच पाहायला मिळते. बल्लारशा वर्धा मेमू रेल्वेच्या वेळापत्रकाबद्दल किंवा उशिरा येण्याविषयी रेल्वेस्थानकावर कोणतीही घोषणा आणि सूचना दिली जात नाही. त्यामुळे महिला प्रवासी रेल्वेची वाट पाहत बराच वेळ ताटकळत बसतात. यामुळे महिला प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा… ‘त्या’ हत्याकांडाचा अखेर उलगडा, आरोपीला रावणवाडीतून अटक; कौटुंबिक वादाचा थरारक अंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांनी वैयक्तिकरित्या आणि प्रवासी संघटनेसारख्या संघटनांनी वर्धा, हिंगणघाट, वरोरा, बल्लारशा, चंद्रपूर येथील स्टेशन मास्तरांना निवेदने दिली, पण यातून काहीही साध्य झाले नाही. या संदर्भात ‘वी फाॅर चेंज’ संघटनेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांना निवेदन दिले. विद्यार्थिनी आणि महिला प्रवाशांची होणारी गैरसोय आणि असुरक्षितता लक्षात घेऊन मेमू रेल्वे वेळेत सोडण्यात यावी, अशी मागणी संस्थेच्या संस्थापक प्रा. डॉ. रश्मी पारसकर सोवनी, सुजाता लोखंडे, रश्मी पदवाड मदनकर, डॉ. चित्रा गुप्ता तूर, डॉ. नंदाश्री भुरे, अनघा वेखंडे, भवरी गायकवाड, कृतिका सोनटक्के, प्राची गायकवाड यांनी केली.