अकोला : महसूल वसुलीमध्ये परिवहन विभागाची गाडी सुसाट धावली. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातून तब्बल २७९.३ कोटी रुपये परिवहन विभाागाच्या तिजोरीत जमा झाले. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२४-२५ या वर्षामध्ये परिवहन विभागाच्या वसुलीत ६४.०३ कोटीने वाढ नोंदवल्या गेली. या महसुलामध्ये विविध करांसह वाहनधारकांच्या दंडाच्या रकमेचा समावेश आहे.

परिवहन विभागाकडून नव्या वाहनांची नोंदणी, वाहन चालवण्याचा परवाना यासह विविध सेवा दिल्या जातात. रस्त्यावरून वाहतूक करतांना नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई देखील परिवहन विभागाकडून केली जाते. या सर्वातून परिवहन विभागाला मोठा महसूल प्राप्त होत असतो. या आर्थिक वर्षात पश्चिम वऱ्हाडासाठी अकोल्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर होऊन ते कार्यान्वित झाले. त्याचा परिणाम परिवहन विभागाच्या कार्यावर दिसून आला. पश्चिम वऱ्हाडातील तीनही जिल्हे मिळून २०२३-२४ मध्ये २६९.७८ कोटींचे लक्ष्य असतांना २१५.२७ कोटींची वसुली झाली होती. त्याची टक्केवारी ७९.१९ होती. २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये त्यात मोठी वाढ दिसून येते. विभागाने २९९.४ कोटींचे लक्ष्य दिले होते. त्यापैकी ९३.२८ टक्के म्हणजेच २७९.३ कोटी रुपयांची वसुली वाहनधारकांकडून करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम वऱ्हाडात अकोला जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये ९८.९१ कोटींचे लक्ष्य होते, तर ८०.११ कोटींची ८१.१५ टक्के वसुली झाली होती. २०२४-२५ मध्ये ११३.२८ कोटींच्या लक्ष्यापोटी १०१.१७ कोटी रुपये वसूल केले. ते ८९.३० टक्के आहे. बुलढाणा जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये ११४.२५ कोटींचे लक्ष्य असतांना ९२.१९ कोटींची ८०.६९ टक्के वसुली झाली होती. २०२४-२५ मध्ये १२२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील ९८.८० टक्के म्हणजेच १२०.५४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. वाशीम जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये ५६.८२ कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यातील ७५.६२ टक्के म्हणजेच ४२.९७ कोटी रुपये वसूल झाले. २०२४-२५ मध्ये ६४.१२ कोटींच्या उद्दिष्टापोटी ५७.६० कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्याची टक्केवारी ८९.८३ आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात ९३.२८ टक्के वसुली झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत वसुलीत १४.०९ टक्के वाढ झाली. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भोयर यांनी सांगितले.