अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गुरुवारी प्रचंड गोंधळ उडाला. दलित वस्ती निधीच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

दोघांकडून एकमेकांना प्रचंड अश्लील शिवीगाळ झाल्याची चर्चा आहे. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत सभेमध्ये हा वाद झाला. मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी दोन्ही आमदारांची समजूत काढून त्यांना रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

अकोला नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी परिसरातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतांना आमदार रणधीर सावरकर व आमदार नितीन देशमुख यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

भर बैठकीत दोन्ही आमदारांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. यावेळी दोन्ही आमदार ऐकमेकांवर धावून देखील गेले होते. उपस्थित मंत्री, इतर आमदार व अधिकाऱ्यांनी दोघांना आवरल्यामुळे हाणामारीचा प्रसंग टळला. या घटनेमुळे सभेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्ते भिडले

भाजप आमदार रणधीर सावरकर व शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात वाद होऊन शाब्दिक चकमक उडाल्याची वार्ता जिल्हाधिकारी परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये पसरली. त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली.

शाब्दिक वाद, शिवीगाळ नाही – रणधीर सावरकर

सभेमध्ये शाब्दिक वाद झाला, मात्र शिवीगाळ झाली नसल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतात. आम्ही लोकशाहीला मानतो. सभेत केवळ बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सभेमध्ये काही जण चित्रफित काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्याला पालकमंत्र्यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर नितीन देशमुख यांनी चित्रफित काढण्याचे समर्थन केले. त्यावर हे योग्य नसल्याचे म्हटल्यावर आमच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली, असे आमदार सावरकर म्हणाले.

जिल्ह्यात भ्रष्टाचार सुरू – देशमुख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासन निधी २९ कोटी रुपये परत गेले. या प्रकारे निधी परत जाणारा अकोला एकमेव जिल्हा आहे. जिल्हा परिषदेचा दलित वस्तीचा निधी महापालिकेला कधीच हस्तांतरीत झाला नाही. जिल्ह्यात भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला.