वर्धा : विदर्भातील शेतकऱ्यांना लाभदायी ठरणारा पैनगंगा-नळगंगा प्रकल्प याचवर्षी सुरू करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात दोन घोषणा करीत लोकांची मने जिंकली.

मुख्यमंत्री म्हणाले, वैनगंगा ते नळगंगा हा सिंचन प्रकल्प याच वर्षी सुरू करणार. या प्रकल्पामुळे दहा लाख एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. एक लाख कोटी रुपये या प्रकल्पवार गुंतवीत आहोत. त्यामुळे वर्धा व विदर्भातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळेल. तसेच नागपूर ते वर्धादरम्यान ‘लॉजिस्टिक पार्क’ उभारणार असून त्यामुळे विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी एका मुद्याकडे लक्ष वेधले. रामनगर परिसरात हजारो कुटुंबे ‘लिज’ जमिनीवर अनेक वर्षांपासून राहत आहे. ठराविक वर्षानंतर ती ‘लिज’ वाढवून घ्यावी लागते. याचा नागरिकांना मनस्ताप होत असल्याची बाब आमदार झाल्यापासून डॉ.पंकज भोयर मांडत आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्री म्हणाले की, पालकमंत्री भोयर हे सातत्याने हा मुद्दा मांडत आहे. पण हा प्रश्न कायमचा निकाली निघाला पाहिजे. म्हणून ‘लिज’धारक कुटुंबांना कायमचा दिलासा मिळावा, म्हणून तसा प्रस्ताव सादर करावा. हे ‘लिज’ पट्टे कायमचे मालकी हक्काचे करून देण्याचे काम त्वरित करून दिल्या जाईल, अशी हमी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, लखपती दिदी, शक्तिपीठ मार्ग, सेवा पंधरवडा, आदिवासी योजना यांचा उल्लेख केला. लोकार्पण करण्यात आलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाबाबत डॉ. भोयर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यामुळे ते पूर्वीच मान्य केले होते. वास्तू व अन्य सुविधा व्हायच्या होत्या. त्या झाल्यात. मी बोललो होतो की, ‘मी पुन्हा येईन’. कदाचित ही वास्तू त्याचीच प्रतीक्षा करीत असेल. म्हणून मी मुख्यमंत्री व अशोक उईके हे पुन्हा आदिवासी विकास मंत्री झाले आणि या इमारतीचे उद्घाटन झाले, असे मुख्यमंत्री यांनी गंमतीत म्हणताच एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा गजरही झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले आणि बोर व्याघ्र प्रकल्प हा विकास व पर्यटनपूरक करून देण्याची विनंती केली. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार सुमित वानखेडे, दादाराव केचे, समीर कुणावार, राजेश बकाने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.