वर्धा : आज केंद्रीय सनदी सेवेचा निकाल लागला. त्यात येथील अभय डागा हा १८५ वी रँक घेऊन उत्तीर्ण झाला आहे. त्याचे वडील डॉ. राजेंद्र व आई डॉ. मीना डागा हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ् असून येथील बॅचलर रोडवर त्यांचे लक्ष्मी हॉस्पिटल आहे. दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या अभयने पोलीस अधिकारी म्हणजे आयपीएस व्हायचे ठरविले आहे. अद्याप तो वर्ग निश्चित व्हायचा आहे. मात्र प्राप्त रँक मुळे ही श्रेणी मिळण्याची त्यास खात्री आहे. महाराष्ट्र कॅडर पण त्यास अपेक्षित आहे. खुल्या गटासाठी महाराष्ट्रातून दोन जागा आहे. त्यात स्थान मिळेल, असे त्याला वाटते.

आयआयटी खरगपूर येथून त्याने पाच वर्षीय बी टेक, एम टेक चे शिक्षण माहिती तंत्रज्ञान विषयात पूर्ण केले. त्यानंतर एक वर्ष अमेरिकेत घालवून तो महाराष्ट्रात परातला. इथे मायक्रोसॉफ्ट कंपनीत त्याचा जॉब सूरू झाला. सायबर सेक्युरिटी हा त्याचा जॉबचा भाग होता. ही नोकरी करीत असतांनाच त्याच्या मनात सनदी सेवेचा पर्याय आला. सेवेचा एक भाग असणाऱ्या सायबर सुरक्षेत खूप काही करण्यासारखे आहे. गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे. नवनवे गुन्हे व गुन्हेगार तयार होत आहे. पोलीस यंत्रणा त्यामुळे चक्रवून जात असून गुन्ह्याचा शोध घेणे रोजचे आव्हान ठरत असल्याचे अभयने हेरले. या क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा उपयोग होवू शकतो. तसेच कार्यालयीन काम करण्यापेक्षा लोकांना हाताळण्याचे व समस्या मार्गी लावण्याचे कार्य अधिक उपयुक्त ठरेल. आपण देशाला एक सुरक्षित स्टेट करण्यासाठी मदत दिल्यास ते जीवनाचे सार्थक ठरेल, अशी त्याची भावना झाली.

हेही वाचा : “सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या”, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी.उषा यांचे मत; म्हणाल्या…

तो अभ्यासास लागला. गणित हा विषय निवडला. कोचिंग क्लास लावायचाच नव्हता. त्यामुळे पूर्णवेळ अभ्यास, वाचन, खेळणे अशी त्याची दिनचर्या राहली. अखेर यश पदरी पडलेच. या कुटुंबाचे स्नेही सनदी लेखापाल राजेंद्र भुतडा सांगतात की अभय हा चवथ्या वर्गापासूनच एक अत्यंत अभ्यासू व हुशार विद्यार्थी राहला आहे. त्याने टॅलेंट हंट व तत्सम राष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या परीक्षा अव्वल क्रमांकासाह उत्तीर्ण केल्यात. अपयश त्याने पाहलेच नाही. अभय म्हणतो क्रिकेट मध्ये माझी रुची राहली. आता पुढे आयपीएससाठी निवड नक्की झाली की पुढील वाटचाल सूरू होईल. त्याची मोठी बहीण डॉ. साक्षी एक उत्तम रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. अभयच्या यशाची माहिती मिळताच त्याचे अभिनंदन करण्यासाठी मित्र घरी पोहचू लागत आहे.