चंद्रपूर: जंगलात बांबूच्या काडया, सरपण आणि कुडयाची फुले आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट नंबर ५२४ मध्ये मंगळवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान भगवानपूर येथे घडली.
मृतक महिला चिरोली येथील रहिवासी असून संजिवनी संजय मॅकलवार (४५) असे तिचे नाव आहे. महिलेसोबत तिचा पती संजय आणि टोलवाही येथील नातेवाईक कवडू बोमनवार, शांताबाई कवडू बोमनवार हे चार जण होते. चौघेही सकाळीच भगवानपूर येथील जंगलात गेले होते. चिरोली,टोलेवाही पासून तीन चार किमी अंतरावर भगवानपूरचे वनविकास महामंडळाचे जंगल आहे. त्याठिकाणी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजिवनीवर हल्ला करून जागीच ठार केले. संजिवनीला फरफटत नेत असताना सोबत असलेल्या नातेवाईकांनी आणि पतीने आरडा ओरड करून वाघाला हुसकावून लावले. तो पर्यंत वाघाच्या हल्ल्यात संजिवनी गतप्राण झाली होती.
ही घटना गावात माहित होताच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे,अशोक सिंघण, टोलेवाही येथिल पोलिस पाटिल संगिता चल्लावार,चिरोली येथील पोलिस पाटिल गोकूळ मोहूर्ले,चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम,प्राणीमित्र उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा मोका पंचनामा करून मृतदेह मूल येथिल उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेेदनासाठी आणण्यात आला. या घटनेने चिरोली,टोलेवाही,भगवानपूर येथे खळबळ उडाली.परिसरातील शेतकर,शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मूल तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यातील मे महिण्यातील ही पाचवी घटना आहे. चंद्रपूर जिल्हयातील सतरा दिवसातील ही दहावी घटना आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण आहे.