लोकसत्ता टीम

गडचिरोली : तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने झडप घालून हल्ला केला. यात महिला जागीच ठार झाली. पार्वताबाई बालाजी पाल (६५) रा. आंबेशिवणी ता. गडचिरोली असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना गडचिरोली तालुक्यातील सावरगाव जंगल परिसरात मंगळवार सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली.

पार्वताबाई ही तीन महिलांसोबत आंबेशिवणीजवळची कठाणी नदी ओलांडून सावरगावच्या जंगलात तेंदूपाने संकलनासाठी गेली होती. दरम्यान झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने पार्वताबाई यांच्यावर हल्ला केला व फरफटत घनदाट जंगलाच्या दिशेने नेले. जवळ असलेल्या महिलांनी आरडाओरड केली असता परिसरात तेंदूपाने गोळा करणारे मजूर गोळा झाले. त्यांनी वाघाला पळवून लावले परंतु तोपर्यंत पार्वताबाई गतप्राण झाली होती.

आणखी वाचा-अंजनगावच्‍या केळीला दुबईकरांची पसंती, वीस टन केळीचा कंटेनर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वेळाने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा परिसर चातगाव वनपरिक्षेत्रात येतो. पार्वताबाई यांच्या मुलाचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून सून व नातू वेगळे राहत होते तर पार्वताबाई ही पती बालाजी पाल यांच्यासोबत राहत होती. त्यांच्यापश्चात पती, विवाहित मुलगी, सून व नातवंडे आहेत.